प्रतिनिधी / कोल्हापूर
कर्णधार विराट कोहलीच भारताला टी-20 वर्ल्डकप जिंकून देईल, असा आत्मविश्वास भारताचे माजी कसोटीवीर यष्टिरक्षक सय्यद किरमाणी यांनी व्यक्त केला आहे. रविवारी होणाऱया पाकिस्तानविरोधातील सामन्यात आपणच जिंकणार अशी भारतीय संघातील प्रत्येक खेळाडूची मनोधारणा आणि स्ट्रटजी असली पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.
किरमाणी शुक्रवारी संस्कारा हिअरिंग सोल्युशन्सच्या क्लिनिकच्या उद्घाटनासाठी कोल्हापूरमध्ये आले होते. उद्घाटन कार्यक्रमानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी 1983 च्या विश्वचषक विजेत्या कपिलदेवच्या भारतीय संघातून खेळताना आलेल्या अनुभवांच्या आठवणीही शेअर केल्या. त्याचबरोबर टी-20 वर्ल्डकप विषयीही भाष्य केले.
किरमाणी म्हणाले, एैंशी, नव्वदच्या दशकात भारतीय संघातून खेळण्याचे भाग्य मला लाभले ते दिवस अविस्मरणीय आहेत. 1983 मध्ये वेस्ट इंडिजला नमवून जिंकलेला वर्ल्डकप प्रत्येक भारतीयाच्या मनात कायमपणे राहणारा आहे. त्यानंतर आपण जर वर्ल्डकप जिंकलो असलो तरी पहिल्यांदा जिंकलेल्या वर्ल्डकपने भारतीय क्रिकेटला बदलून टाकले, हे विसरता येणार आहे. त्यावेळचे आणि आजचे क्रिकेट यात प्रचंड फरक आहे. तेंव्हा आम्हाला माल्कम मार्शन, मायकेल होल्डिंग, अँडी रॉबर्टस्, ज्योएल गार्नर यांच्यासारख्या वेस्टइंडिजच्या अत्यंत वेगवान गोलंदाजांचा सामना करावा लागला. आमच्याकडे हेल्मेट नव्हती, थायपॅड नव्हती. हँडग्लोज थायपॅड म्हणून वापरून आम्ही वेगवान गोलंदाजांचा सामना केला. आज क्रिकेट बदलले आहे. आमच्यावेळी एकच व्यवस्थापक असे. टेनर, फिजिओ नव्हता. आजच्या संघासाठी पंधरा वीस जणांचा सर्पोट स्टाफ असतो. अत्याधुनिक तंत्रज्ञान, मशिन मदतीला आहे. व्हिडिओ शूटिंगच्या आधारे प्रतिस्पर्धी संघाची माहिती घेता येते. कर्णधारासह खेळाडूला कसे खेळायचे, कशी स्ट्रटजी वापरायची हे सर्पोट स्टाफ सांगत असतो. आमच्यावेळी मैदानावर आणि मैदानाबाहेर अशा सुविधा नव्हत्या. आजचे क्रिकेट वेगवान झाले आहे.
भारत आणि पाकिस्तान यांच्या टी-20 वर्ल्डकपमध्ये रविवारी सामना होत आहे. या सामन्याला काही जण विरोध करत आहेत. याविषयी छेडले असताना किरमाणी म्हणाले, भारत आणि पाकिस्तानचे खेळाडू एकमेकांचा आदर करतात. मैदानावर आक्रमक असतात. खेळ हा खेळ आहे. त्यामुळे तो व्हायला हवा.
वर्ल्डकप जिंकल्यावर प्रचंड सन्मान मिळाला
कपिलदेव यांच्या भारतीय संघाने वर्ल्डकप जिंकला तेव्हा आजच्या संघासारखे बक्षिस, पैसे मिळाले नाहीत असे म्हटले जाते याविषयी विचारले असताना किरमाणी म्हणाले, ती गोष्ट वेगळी आहे. आम्हाला जो सन्मान मिळाला, तो महत्वाचा आहे. आपण कितीही वर्ल्डकप जिंकलो तरी 1983 च्या वर्ल्डकपची आठवण कायम पहिल्यांदा काढली जाणार हाच आमचा सन्मान आणि बक्षीस आहे, असेही किरमाणी म्हणाले.
कर्णधार विराट कोहलीच भारताला टी-20 वर्ल्डकप जिंकून देऊ शकतो, असे सांगत किरमाणी यांनी भारतीय संघ दावेदार असल्याचे स्पष्ट केले. पाकिस्तान विरूद्धच्या सामन्यात आपणच जिंकणार ही स्ट्रटजी भारतीय संघाने ठेवावी. जिंकण्यास अडचण नाही, असेही किरमाणी म्हणाले.
आठवण कोल्हापूरची
कोल्हापूरला आपण यापूर्वी एकदा रणजी ट्रॉफीतील सामन्यासाठी येऊन गेलो होतो. कोल्हापूरचा गुळ, कोल्हापुरी चप्पल, कोल्हापुरी मिसळबद्दल आपल्याला माहिती आहे, असे किरमाणी म्हणाले.