ऑनलाईन टीम / वसई :
दोन दिवसांपूर्वीची नाशिकची ऑक्सिजन टाकी लीक झाल्याने 24 जणांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच आता वसईतील एका कोविड हॉस्पिटलमध्ये मध्यरात्रीच्या सुमारास आग लागल्याची मोठी दुर्घटना घडली आहे. या आगीत 13 जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे.
विरारमधील विजय वल्लभ रुग्णालयात अतिदक्षता विभागास आग लागून काही रुग्णांचा मृत्यू झाल्याप्रकरणी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधून आग विझवणे व इतर रुग्णांवरील उपचार सुरू राहतील याकडे लक्ष देण्यास सांगितले, अशी माहिती मुख्यमंत्री कार्यालयाने ट्विट करत दिली आहे.
उपचार घेत असलेल्या इतर रुग्णांना झळ पोहचू नये याकडे लक्ष देत त्यांची लगेचच इतरत्र व्यवस्था करावी असे निर्देशही त्यांनी दिले आहेत. या खासगी रुग्णालयात अग्नी सुरक्षेची पुरेशी काळजी घेतली होती किंवा नाही हे पाहून तातडीने योग्य ती चौकशी करण्याचे निर्देशही त्यांनी प्रशासनाला दिले आहेत, अशी माहिती देण्यात आली आहे.
- मुख्यमंत्र्यांकडून मदतीची घोषणा
विरार येथील विजय वल्लभ रूग्णालयातील आगीत मृत्युमुखी पडलेल्या मृतांच्या वारसांना 5 लाखांची मदतची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. यासोबतच गंभीर जखमींना 1 लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे.
- पंतप्रधान मोदींकडून मदत जाहीर
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरार रुग्णालयात लागलेल्या आगीत मृत्यूमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना पीएमएनआरएफकडून प्रत्येकी दोन लाख रुपये आणि गंभीर जखमींना 50,000 रुपये देण्याची घोषणा केली.
- विरार रुग्णालयातील घटना अतिशय दुर्दैवी : आरोग्यमंत्री
विरार रुग्णालयातील ही घटना अतिशय दुर्दैवी आहे अशी भावना राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केली आहे. ते म्हणाले, प्राथमिक स्तरावर पाहता ही दुर्घटना असल्याचे समजते आहे. अचानकपणे एसीचा स्फोट झाल्याने केवळ दोन ते तीन मिनीटात सर्वत्र धुर पसरला. त्यामुळे रुग्णांना वाचवायला वेळ कमी मिळाला. दरवाज्याच्या जवळील चार रुग्णांना वाचवण्यात यश आले आहे. या घटनेवर शासनस्तरावर योग्य ती मदत केली जाईल.
ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी रुग्णालयाला भेट देवून पाहणी केली.