सत्ताधारी गटनेते संजय कामतेकर यांचा आरोप : नगराध्यक्षांच्या अनुपस्थितीतही प्रशासन योग्यरितीने सुरू!
वार्ताहर / कणकवली:
कणकवली न. पं.मार्फत शहरातील गोरगरिब जनतेसाठी सुरू असलेले काम पाहूनच विरोधी नगरसेवकांकडून नगराध्यक्ष व त्यांच्या सहकाऱयांना बदनाम करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. नगराध्यक्षांच्या अनुपस्थितीत सत्ताधारी म्हणून आम्ही प्रशासन योग्यरितीने चालवित असल्याने विरोधकांना पोटशूळ उठला आहे. यापूर्वी न्यायालयीन प्रक्रियेमुळे नगराध्यक्ष 25 दिवस नव्हते, तेव्हाही उपनगराध्यक्ष व सत्ताधारी नगरसेवक म्हणून आम्ही जनतेला त्रास होता नये, असे काम करून दाखविले होते. तेव्हाही विरोधकांनी टीका करण्याचेच काम केले. चांगले म्हणण्याची विरोधकांना सवय नसल्यानेच 2018 च्या निवडणुकीत पारकर गटाला शहरवासीयांनी घरी बसविले. वैयक्तिक आरोप करण्याव्यतिरिक्त विरोधकांकडे मुद्दाच नाहीय, अशी टीका न. पं.चे सत्ताधारी गटनेते संजय कामतेकर यांनी केली.
येथील नगराध्यक्ष दालनात आयोजित पत्रकार परिषदेत कामतेकर बोलत होते. यावेळी उपनगराध्यक्ष रवींद्र गायकवाड, नगरसेवक बंडू हर्णे, ऍड. विराज भोसले, मेघा गांगण, अजय गांगण, किशोर राणे आदी उपस्थित होते.
कामतेकर म्हणाले, कोरोनामुळे शहरात न. पं.मार्फत जंतुनाशक फवारणी, डास प्रतिबंधात्मक फवारणी, हॅण्ड वॉश, सॅनिटायझर टनेल, 540 गरजू कुटुंबांना मोफत धान्य व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप, नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या मानधनाच्या रकमेतून रोज 200 लोकांना कमळ थाळी देण्याचे काम सत्ताधारी म्हणून केले.
हर्णे म्हणाले, न. पं.मधील विरोधकांकडून त्यांच्या नेत्यांचे अनुकरण करण्याची अपेक्षा होती. मात्र, गेला दिड महिना विरोधक केवळ राजकारणच करत आहेत. सुशांत नाईक यांची क्षमता असतानाही त्यांनी आपल्या इमारत बांधकाम कामगारांना प्रसिद्धी मिळविण्यासाठी दिलेली किट वगळता सर्वसामान्यांना मदत करताना ते दिसले नाहीत. पोलीस कायद्याला धरून कारवाई करत नाहीत, हे नाईक यांनी मान्य केले. तरीही सर्वसामान्यांची वाहने अगोदर द्या व नंतरच न. पं.ची गाडी द्या, अशीच आमची भूमिका असणार आहे. पोलीस, आरोग्य कर्मचारी, महसूल विभाग यांनी कोरोनाच्या काळात चांगले काम केले, त्यांचे न.पं.ने कौतूकच केले आहे. पोलिसांना तपासात सहकार्य म्हणून आम्हीच ही गाडी पोलिसांनी सांगितल्यावर त्यांच्या ताब्यात दिली.
पोलिसांचा सन्मान करण्याबाबत कन्हैया पारकर यांनी आम्हाला शिकवू नये. काही वर्षांपूर्वी त्यांचे नेते संदेश पारकर यांनी कणकवलीचे अधिकारी अरुण साळुंखे यांना मारहाण केली होती. याप्रकरणी पारकर यांच्यावर गुन्हाही दाखल झाला होता. नगराध्यक्षांच्या खुर्चीची नाईक व पारकर यांनी काळजी करू नये. या दोघांनाही सत्तेतून घरी बसवून कणकवलीकरांनी आमच्याकडे नगराध्यक्षपदाची खुर्ची दिली आहे. नार्वेकर यांच्या नगरसेवक पदाचाच सात-बारा पारकर यांनी नावावर केला आहे. त्यामुळे पारकर सोबत असताना नार्वेकर यांना नगराध्यक्ष पदाची खुर्ची कदापि मिळणार नाही. शैलेश भोगले यांना पोलीस कारवाईचा अनुभव आहे. त्यांच्यावरही खंडणीच्या प्रकरणात गुन्हा दाखल होता. मात्र, न्यायालयाने त्यांना क्लीन चीट दिली. त्यामुळे नगराध्यक्षांबाबत मागणी करताना त्यांनी आपल्यावरील कारवाईचे पुनर्विलोकन करावे.
आम्हाला राजकीय भूकंपाची सवय!
सरकारने पत्रकबाजी करण्यासाठी नाही, तर कोरोना रोखण्यासाठी घरात बसण्याचे आवाहन केले, असा टोला गायकवाड यांनी नाईक यांना लगावला. अशा किती तरी राजकीय भूकंपांची आम्हाला सवय आहे व त्यातून सावरण्यासाठी आपत्ती निवारण करण्याचीही सवय आहे. त्यामुळे आमची काळजी नाईक व पारकर यांनी करू नये, असे गायकवाड यांनी सांगितले.