महाराष्ट्राची बदनामी करण्यातच भाजपाला आनंद, अंबानीला वाचविण्यासाठी सचिन वाझेची टेप वाजविली
प्रतिनिधी / सांगली
जनतेच्या प्रश्नांवर तसेच महागाईच्या प्रश्नांवर कोणतीही चर्चा विरोधकांना नको होती. त्यांना फक्त अंबानीला वाचवायचे होते. म्हणूनच सचिन वाझेची टेप त्यांनी वाजविली. विरोधकांकडून सातत्याने महाराष्ट्राची बदनामी करण्याचे धोरण अवलंबिले गेले आहे. विरोधकांच्या डबल ढोलकीचा प्रत्यय आता महाराष्ट्रातील जनतेला येत असल्याची टिका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पत्रकार बैठकीत केली.
सांगलीत काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांच्या बंगल्यावर झालेल्या या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी विरोधकांचा खरपूस समाचार घेतला. यावेळी काँग्रेसचे अध्यक्ष मोहनराव कदम, पृथ्वीराज पाटील, आमदार विक्रम सावंत, जयंत आसगावकर, विशाल पाटील, महापौर दिग्विजय सूर्यवंशी, उपमहापौर उमेश पाटील यांची उपस्थिती होती.
नाना पटोले म्हणाले, अंबानीला त्याच्या घरावरून हेलिकॉप्टर उडविण्याची परवानगी पाहिजे तसेच त्याच्या कुंटुंबियांना झेड पल्स सुरक्षा व्यवस्था पाहिजे. या दोन्ही गोष्टीला राज्यसरकारने विरोध केला आहे. शेतकरी आंदोलनाचा संपूर्ण रोष हा अंबानीवरच आहे. त्यामुळे या अंबानीला वाचविण्यासाठी भाजपाकडून सध्या आदळआपट सुरू आहे. त्यांच्या घरापासून एक किमी च्या अंतरावर ही गाडी सापडली त्या गाडीत कोणतीही स्फोटके नसल्याचे विरोधकांनीच सांगितले आहे.
तरीसुध्दा त्यावर एवढा खळ करण्याचे काहीच कारण नव्हते. पण अंबानीच्या गुडबुकमध्ये येण्यासाठी आणि त्याला वाचविण्यासाठी विरोधक धडपडत असल्याचा आरोप त्यांनी केला. सचीन वाजेची कोणतीही तपासणी किंवा कोणतीही माहिती घेण्यास एनआयएला कोणीही अडविले नाही. असेही त्यांनी सांगितले.
महागाईवर विरोधक काहीच बोलत नाही
देशात पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढले त्याबाबत काहीच कोणी बोलत नाही. त्याला आम्ही विरोध केल्यावर आम्हालाच ते सांगतात राज्यसरकारने कर कमी करा. पण केंद्र सरकार डिझेलवर 18 रूपये रोड टॅक्स घेते आणि चार रूपये शेतकऱयांच्या विकासासाठी आकारत आहे. मग यातील काही रक्कम केंद्र सरकाराने कमी केल्यास सहजपणे इंधन दरवाढ निश्चित थांबू शकते पण त्यावर भाजपा काहीही बोलत नसल्याचे त्यांनी सांगितले.
विरोधक आता राष्ट्रपती राजवटची भाषा बोलत आहेत
यापुर्वी राज्यात भाजपाचे सरकार दोन महिन्यात येणार म्हणून विरोधक बोलत होते. पण गेल्या दोन महिन्यापासून त्यांनी आता राज्यात राष्ट्रपती राजवट लागली जाणार अशी भाषा वापरण्यास प्रारंभ केला आहे. पण भाजपाचे हे स्वप्न पुर्ण होणार नाही कारण महाविकास आघाडीचे सरकार हे पाच वर्ष टिकणार आहे. त्यामुळे राज्यात ना भाजपाचे सरकार येणार आहे ना राष्ट्रपती राजवट लागणार आहे असेही त्यांनी स्पष्ट केले.