पंतप्रधान मोदींची भाजप खासदारांना सूचना
@ नवी दिल्ली / वृत्तसंस्था
बिनबुडाचे विषय उपस्थित करुन संसदेचे कामकाज बंद पाडण्याचा विरोधकांचा कट हाणून पाडा अशी स्पष्ट सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजप खासदारांना केली आहे. लवकरच भारत आपल्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण करीत आहे. या संदर्भात प्रत्येक भाजप खासदाराने त्याच्या मतदारसंघातील प्रत्येक खेडय़ात यानिमित्त समाजोपयोगी कार्यक्रमाचे आयोजन करावे, असे निर्देशही त्यांनी दिले. ते मंगळवारी येथे भाजप खासदारांच्या बैठकीत भाषण करीत होते.
संसदेच्या सध्या सुरू असणाऱया पावसाळी अधिवेशनाताचे पहिले सहा दिवस विरोधकांच्या गोंधळामुळे वाया गेले आहेत. सरकार प्रत्येक प्रश्नावर चर्चा करण्यास तयार आहे. मात्र, विरोधकांना त्यांचे पितळ उघडे पडेल याची भीती वाटते. त्यामुळे ते चर्चेपासून पळ काढत आहेत. हा त्यांच्या कटकारस्थानाचा एक भाग आहे. यापुढे भाजप खासदारांनी आक्रमकपणे विरोधकांची कारस्थाने उधळून लावावीत. तसेच विरोधकांना जनतेसमोर उघडे पाडावे, असा संदेश त्यांनी दिला.
भाजप खासदारांनी सातत्याने जनतेच्या संपर्कात राहून जनतेला आधार द्यावा. कृषी कायदे व इतर सरकारी योजनांची त्यांना माहिती द्यावी. जनतेच्या हितार्थ अनेक योजना केंद्र सरकारने चालविल्या आहेत. त्यांचा लाभही जनतेला होत असल्याने विरोधक अस्वस्थ आहेत. त्यामुळेच संसदेत कामकाज होऊ ने देण्याचा चंग त्यांनी बांधला आहे, असे शरसंधान पंतप्रधान मोदी यांनी केले.
हा केवळ सरकारी कार्यक्रम नको
भारताच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव हा केवळ सरकारी कार्यक्रम राहता कामा नये. प्रत्येक खासदाराने त्याच्या मतदारसंघातील खेडय़ात आणि कानाकोपऱयात विविध कार्यक्रमांचे आयोजन करावे. या कार्यक्रमांमध्ये जनतेला सहभागी करुन घ्यावे. जनहितार्थ सरकारने केलेल्या कामगिरीचा परिचय त्यांना करुन द्यावा. यापुढच्या काळात विकासकामे कशी आणि कोणती व्हावीत, यासंबंधी थेट जनतेकडून सूचना घ्याव्यात. यापुढील 25 वर्षांमध्ये, अर्थात देशाच्या स्वातंत्र्याची 100 वर्षे साजरी करताना जनतेला देश कसा हवा आहे, याची माहिती घेऊन त्यासाठी आजपासूनच झटण्याचे आवाहनही त्यांनी खासदारांना केले.