संसदेतील गदारोळावरून पंतप्रधानांचा विरोधकांवर निशाणा : अन्न महोत्सव लाभार्थींशी पंतप्रधान मोदींचा संवाद
नवी दिल्ली, अयोध्या / वृत्तसंस्था
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी उत्तर प्रदेशमधील अन्न महोत्सव लाभार्थींना संबोधित केले. यावेळी पंतप्रधानांनी राज्यातील काही निवडक लाभार्थ्यांशी थेट संवाद साधला. याचदरम्यान, संसदेच्या पावसाळी अधिवेशनात पंतप्रधानांनी विरोधकांच्या गदारोळावरही निशाणा साधला. राहुल गांधी यांचे नाव न घेता त्यांनी एकीकडे आपला देश, आपले युवक भारतासाठी नवीन कामगिरी करत आहेत, विजयाचे गोल करत आहेत, तर देशात काही नेते राजकीय स्वार्थापोटी ‘सेल्फ गोल’ साध्य करण्याचा प्रयत्न करत असल्याचा हल्लाबोलही त्यांनी केला.
देशात सध्या अन्न महोत्सव सुरू असून गुरुवारी पंतप्रधानांनी या महोत्सवातील लाभार्थींशी संवाद साधला. याप्रसंगी राज्यातील 80 लाख लोकांना मोफत धान्यवाटप करण्यात आले. यावेळी बोलताना दिल्लीतून उत्तर प्रदेशात पोहोचलेले अन्न-धान्य आज तुमच्या थाळीत पोहोचत असल्याबाबत आपल्याला समाधान वाटते, असे मोदींनी स्पष्ट केले. तसेच राज्यातील पूर्वीच्या सरकारांच्या काळात उत्तर प्रदेशमध्ये गरिबांच्या अन्नधान्याची लूट करण्याची कोणतीही संधी सोडली नसल्याचा आरोपही त्यांनी केला.
देश थांबणार नाही, वेग घेणार !
देशाला काय हवे आहे, देश काय साध्य करत आहे, देश कसा बदलत आहे? याच्याशी विरोधकांचा काहीही संबंध नाही. हा महान देश अशा स्वार्थी आणि देशविरोधी राजकारणाचा ओलीस बनवू शकत नाही. विरोधकांनी देशाचा विकास रोखण्याचा कितीही प्रयत्न केला तरी हा देश त्यांना थांबवणार नाही. प्रत्येक अडचणीला आव्हान देत देश प्रत्येक आघाडीवर वेगाने प्रगती करत आहे, असेही ते पुढे म्हणाले. ज्यांना फक्त त्यांच्या पदाची चिंता आहे, ते आता भारताला थांबवू शकत नाहीत. आता केवळ रँक नाही तर पदके जिंकून नवीन भारत जगावर राज्य करत आहे. नवीन भारताचे मार्गक्रमण केवळ परिवाराने नाही तर कठोर परिश्रमाने निश्चित पेले जाईल, अशी टोलेबाजीही पंतप्रधानांनी केली.
योगी आदित्यनाथांची प्रशंसा
देश नवीन उंची गाठत असल्याचे नमूद करत पंतप्रधानांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या कामाची प्रशंसा केली. उत्तर प्रदेशने देशाची क्षमता वाढवली आहे. वैद्यकीय सेवांशी संबंधित पायाभूत सुविधा असो किंवा जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहीम असो किंवा देशातील नागरिकांना उपासमारीपासून वाचवण्याची सर्वात मोठी मोहीम असो, आज भारत यशासह पुढे जात आहे, असे मोदी म्हणाले. देशाची क्षमता वाढवण्यासाठी यूपीच्या लोकांनी खांद्याला खांदा लावून काम केले आहे. हायवे एक्स्प्रेस वे, डेडिकेटेड प्रेट कॉरिडॉर आणि डिफेन्स कॉरिडॉरसारखे प्रकल्प उत्तर प्रदेशात वेगाने प्रगती करत आहेत, असाही उल्लेख पंतप्रधानांनी केला.