प्रशांत किशोर यांच्याकडून राहुल-सोनिया गांधी लक्ष्य : 10 वर्षांमध्ये काँग्रेस 90 टक्के निवडणुकांमध्ये पराभूत
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
तृणमूल काँग्रेस आणि काँग्रसमधील ‘पर्याया’च्या लढाईत आता राजकीय रणनीतिकार प्रशांत किशोर यांची एंट्री झाली आहे. प्रशांत किशोर यांनी काँग्रेस नेतृत्वावर टीका करताना काँग्रेस मागील 10 वर्षांमध्ये स्वतःच्या 90 टमक्के निवडणुकांमध्ये पराभूत झाला आहे, अशा स्थितीत विरोधकांचे नेतृत्व हा काँग्रेसचा दैवी अधिकार असू शकत नसल्याचे म्हटले आहे.
काँग्रेस ज्या विचार आणि विस्ताराचे प्रतिनिधित्व करतो, ते मजबूत विरोधी पक्षासाठी महत्त्वपूर्ण आहे. पण विरोधी पक्षाचे नेतृत्व हा काँग्रेसचा दैवी अधिकार नाही. मागील 10 वर्षांमध्ये स्वतःच्या 90 टक्के निवडणुकांमध्ये पराभूत होत असताना तर नाहीच. लोकशाहीच्या पदध्=तीने विरोधी पक्षाचे नेतृत्व निश्चित करू देण्यात यावे असे प्रशांत यांनी ट्विट करत म्हटले आहे.
ममता विरुद्ध काँग्रेस
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागल्या आहेत. विविध राज्यांमधील पक्षांच्या नेत्यांना भेटून ममता बॅनर्जी भाजपविरोधात पर्याय ठरू पाहत आहेत. राजकीय पक्ष लढण्यासाठी तयार असतील तरच भाजप विरोधात राष्ट्रीय पर्याय निर्माण होऊ शकतो. पर्याय मजबूत असावा, एकटय़ाने हे घडवून आणता येणार नसल्याचे ममतांनी बुधवारी मुंबई येथे बोलताना म्हटले होते.
काँग्रेसला केले लक्ष्य
कुणी लढत नसल्यास आम्ही काय करावे. जर कुणी काहीच करत नाही आणि विदेशात राहत असेल तर कसे चालणार, असे ममतांनी राहुल गांधी यांचे नाव न घेता म्हटले होते. आता संयुक्त पुरोगामी आघाडीच नसल्याने त्याचा नेता कोण होणार हा प्रश्नच उद्भवत नाही असे उद्गार ममतांनी काढले होते.
काँग्रेसकडून प्रत्युत्तर
संपुआसंबंधी ममतांच्या वक्तव्यानंतर काँग्रेस आक्रमक झाला आहे. काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी, दिग्विजय सिंह, कपिल सिब्बल, मल्लिकार्जुन खर्गे यांनी ममता बॅनर्जी आणि तृणमूलला लक्ष्य केले. ममता यांनी भाजपसोबत संगनमत केले आहे. पंतप्रधान मोदींच्या सुचनेनुसार ममता बॅनर्जी काँग्रेसमध्ये फूट पाडण्याचा कट रचत असल्याचा आरोप चौधरी यांनी केला आहे.
ममता नेतेपदाच्या शर्यतीत
पश्चिम बंगालमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत प्रशांत किशोर यांनी ममता बॅनर्जी यांच्या प्रचारमोहिमेची आखणी केली होती. या निवडणुकीत ममता बॅनर्जी यांच्या पक्षाचा मोठा विजय झाला होता. या विजयानंतर ममता बॅनर्जी विविध राज्यांचा दौरा करून पक्षाचा विस्तार करू पाहत आहेत. ममतांना विरोधी पक्षाचा नेता म्हणून सादर करण्यासाठी प्रशांत किशोर काम करत असल्याचे मानले जातेय.