रिवण जि. पं. मतदारसंघातील काँग्रेस उमेदवार अभिजित देसाई यांचा दावा : जनतेसाठी कार्य चालूच राहील
प्रतिनिधी / सांगे
विरोधकांनी आपल्या विरोधात खोटा प्रचार केला तसेच आपण जिल्हा पंचायत सदस्य म्हणून निवडून आल्यास अपात्र होणार असा निवडणुकीच्या आदल्या दिवशी समाजमाध्यमांचा गैरवापर करून अपप्रचार करून मतदारांची दिशाभूल केली. मतदानावर त्याचा परिणाम झाला. आपला पराभव जरी झाला असला, तरी जनतेसाठी आपण तितक्मयाच ताकदीने आणि नेटाने कार्य करत राहीन. आपल्यासाठी कार्य केलेले काँग्रेसचे कार्यकर्ते, हितचिंतक व मतदारांचे आपण मनापासून आभार मानतो, असे रिवण जिल्हा पंचायत मतदारसंघातील काँग्रेस पक्षाचे पराभूत उमेदवार अभिजित देसाई यांनी सांगे येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.
रिवण मतदारसंघात सर्वत्र आपला आवाज होता. पण भाजपने खुला प्रचार केला, बैठका घेतल्या. तसेच आपल्या विरोधकांना हाताशी धरून अपप्रचार केला. त्यामुळे आपली मते भाजपकडे व इतरत्र वळली. ज्या मतदारांनी आपल्यावर विश्वास ठेवून आपल्याला मतदान केले त्यांचा आपण ऋणी आहे, असे देसाई म्हणाले.
नेत्रावळी पंचायत क्षेत्रात येणाऱया पर्यटकांकडून पंचायतीला उत्पन्न प्राप्त व्हावे म्हणून टोल गोळा करण्यामागचा उद्देश चांगला होता. तेथे भ्रष्टाचाराला थारा नव्हता. कदाचित सोपस्कार योग्य पद्धतीने झाले नसतील. पण याचा बाऊ करून पंचायत संचालकांकडे आपल्या विरोधकांनी तक्रार केली. यामध्ये सुरुवातीपासून आजपर्यंत राजकीय हस्तक्षेप होत आला आहे. पंचायत संचालकांनी दोषी ठरवून अपात्र घोषित केले. त्यास आपण जिल्हा न्यायालयात आव्हान दिले असता तेथे आपण जिंकलो. त्यानंतर उच्च न्यायालयात देखील निकाल आमच्या बाजूने लागला. आता हे प्रकरण आपल्या विरोधकांनी सर्वोच्च न्यायालयात नेले असून न्यायालयाने चार आठवडय़ांत उत्तर देण्याबाबत नोटीस बजावली आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
समाजमाध्यमांतून अपप्रचाराचा दावा
असे असताना, याचिका दाखल करून घेतली आहे आणि जो निर्णय येणार त्याचा परिणाम जिल्हा पंचायत निवडणूक निकालावर होणार असून आपण निवडून आल्यास अपात्र होऊ शकतो, असा अपप्रचार निवडणुकीच्या आदल्या दिवशी समाजमाध्यमांचा गैरवापर करून करण्यात आला, असा दावा देसाई यांनी केला. यामागे राजकारण्यांचा हात असून याचिका गुदरण्यास पैसे कोण पुरवितो, असा सवाल त्यांनी केला. आपला स्वभाव रिवण व सांगे मतदारसंघातील जनतेला माहीत आहे. मतदार हुशार आहेत. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत सांगेमध्ये काँग्रेसचा विजय नक्की आहे, असे ते म्हणाले.
भाजपने नियम पाळले नाहीत
अनेक मतदारांपर्यंत आपल्याला पोहोचता आले नाही. प्रचारासाठी वेळ कमी होता. आचारसंहितेचे आम्ही काटेकोरपणे पालन केले. मात्र भाजपने कोणतेही नियम पाळले नाहीत. विरोधकांना मिळालेली मते भाजपपेक्षा जास्त आहेत, असे देसाई यांनी सांगितले. शेतकऱयांचे प्रश्न, ऊस उत्पादकांच्या प्रश्नांवर आपण आवाज उठविणार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. वाडे येथे बैठक घेऊन जे धरणे आंदोलन करण्याचे ठरविले गेले आहे त्यास देसाई यांनी काँग्रेस किसान विभागाच्या वतीने पाठिंबा जाहीर केला. यावषी काजुबियांना प्रति किलो रु. 200 दर मिळणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले.
बेंडवाडा पुलाचे काम सुरू न केल्यास 28 पासून रास्ता रोको
सांगे-बेंडवाडा येथील बंद असलेले पुलाचे काम सरकारने त्वरित सुरू न केल्यास सोमवार 28 पासून रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार असल्याचे देसाई यांनी स्पष्ट केले. आमच्याकडून ज्या काही चुका झाल्या आहेत त्या सुधारून 2022 च्या विधानसभा निवडणुकीच्या तयारीला आम्ही लागणार आहोत, असे ते म्हणाले.
अंतर्गत फुटीमुळे सांगे मतदारसंघात काँग्रेसचा उमेदवार पराभूत व्हायचा. आता ही परिस्थिती राहिली नसून जिल्हा पंचायत निवडणुकीत जनतेने चांगला प्रतिसाद दिला. त्यामुळे तीन हजारांहून जास्त मते काँग्रेस उमेदवाराला पडली, असे सांगून सर्वांचे डॉ. रेवणसिद्ध नाईक यांनी आभार मानले. सांगेमध्ये काँग्रेस पक्षाचे काम चालूच राहील. काँग्रेसच्या चिन्हावर निवडून येऊन भाजपात उडी मारणाऱया आमदारांनी काँग्रेस पक्षाला सल्ला देऊ नये. गिरीश चोडणकर, संकल्प आमोणकर या नेत्यांनी काँग्रेस पक्ष संभाळून ठेवला आहे, असे ते म्हणाले. चोडणकर यांनी प्रदेश अध्यक्षपद सोडू नये, असे मत डॉ. नाईक यांनी व्यक्त केले. या पत्रकार परिषदेला सांगे काँग्रेस गटाध्यक्षा जुजेफिना रॉड्रिग्स, युवक काँग्रेस गटाध्यक्ष प्रकाश भगत व ज्येष्ठ काँग्रेस कार्यकर्ते दादी करमळकर हजर होते.