मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची टीका : विरोधकांनी सत्तेवर असताना सामान्यांचा विचार केला नाही,पंचायतस्तरावर गोवा स्वयंपूर्ण करण्यासाठी मोहीम
वार्ताहर /शिवोली
विरोधीपक्ष नेते आमदार दिगंबर कामत, लुईझिन फालेरो, विजय सरदेसाई युती करण्यासाठी भीक मागत फिरत आहेत. विरोधीपक्ष नेत्यांनी फक्त स्वार्थासाठी सरकार चालविले. त्यांच्या कार्यकाळात कुठलेची जनहितार्थ कामे झाली नाही, अशी जोरदार टीका मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी विरोधीपक्ष नेत्यांवर केली. यावेळी त्यांच्यासोबत माजी आमदार दयानंद मांद्रेकर, भाजपा मंडळाध्यक्ष मोहन दाभाळे, प्रभारी राजसिंह राणे, हणजुण जि.पं. सदस्या निहारीका मांद्रेकर, माजी सरपंच दिगंबर आगरवाडेकर व इतर उपस्थित होते.
शिवोली मतदारसंघाचा संपूर्ण दिवस दौरा करुन आढावा घेतल्यानंतर मार्ना-शिवोली पंचायतीचे माजी सरपंच दिगंबर आगरवाडेकर यांच्या निवासस्थानी त्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी विरोधकांवर टीका केली.
सरकारच्या प्रत्येक गोष्टींवर आमदार दिगंबर कामत, पर्वरीचे आमदार रोहन खंवटे टीका करीत असतात. त्यानी टीका करणे एक राजकरण केले आहे. दिगंबर कामत यांनी आपले सरकार असताना सर्वसामान्यांचा विचार केला नाही. फक्त स्वार्थ साधला.
प्रत्येक ग्रामपंचायतीत सरकारी अधिकाऱयाची नेमणूक
सरकारी योजना लोकांपर्यंत पोचाव्यात म्हणून प्रत्येक पंचायतीत सरकारी अधिकाऱयाची नेमणूक केलेली आहे. सरकारी योजना पणजी येथे ठेवण्यासाठी राबविल्या नाहीत. दर शनिवार पंचायतीत जाऊन सरकारी योजनांची माहिती त्याच्याकडून घेऊ शकतात. संपूर्ण गोवा स्वयंपूर्ण करण्यासाठी भाजपा सरकार कार्यरत आहे, असे मुख्यमंत्री सावंत सांगितले.
प्रधानमंत्री कौशल्य योजना
केंद्रातील भाजप सरकार ‘आत्मनिर्भर भारत’ अंतर्गत विविध योजना राबवत आहे. प्रधानमंत्री कोशल्य योजनेंतर्गत ‘औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत युवकांमध्ये कौशल्य निर्माण करण्याचे काम चालू आहे. त्यामुळे त्यांना आत्मनिर्भर होता येईल, असे सावंत यांनी सांगितले.
पाच हजार नोकऱया देणार
भाजपा सरकारने दिलेले आश्वासन पूर्ण करताना एकूण पाच हजार नोकऱया काढल्या आहेत. युवकांना नोकरी मिळाव्या म्हणून अजून पाच हजार नोकऱया सरकार काढणार आहे. आम्ही जनतेच्या हितासाठी काम करीत आहोत त्यामुळे आम्हाला भीती वाटत नाही. आपल्या प्रत्येक नागरिकाची चिंता आहे. मग ती विधवा तरुणी असो की, बेरोजगार युवक तसेच वयोवृद्ध महिला असो. आपल्याला त्यांची चिंता सतावते, असे मुख्यमंत्री म्हणाले.
कार्यकर्त्यांमध्ये उत्साह
गोव्यात भाजपाचे सरकार पुन्हा एकदा गोव्यात स्थापन करण्यासाठी कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे. भाजपा युवा मोर्चा तसेच महिला मोर्चाचे कार्यकर्त्यांनी मोठय़ाप्रमाणात सहभाग दाखविला होता. प्रत्येक पंचायतीत कार्यकर्त्यांनी आपले स्वागत केले. नंतर त्यांच्याकडे आपण संवाद साधला. त्यांच्या समस्या जाणून घेतल्या व त्या मार्गी लावण्यासाठी आदेश दिल्याचे त्यांनी सांगितले.
‘स्वयंपूर्ण मित्र’
आपल्या संपूर्ण दिवसाच्या दौऱयातील ‘स्वयंपूर्ण मित्र’ भागावर आपण जास्त भार दिला. शिवोली मतदारसंघातील सहाही पंचायतीत काम करणारे आपले ‘स्वयंपूर्ण मित्र’ व सरकारी अधिकारी यांच्यात संवाद घडवून आणून त्यांच्या कामांचा आढावा घेतला. ग्रामपंचायत स्तरावर आपण ‘गोवा स्वयंपूर्ण’ करण्यासाठी मोहिम सुरुवात केलेली आहे.
वर्ष 2020 सालातील स्वप्ने पूर्ण होणार
2 ऑक्टोबर 2020 रोजी आपण गोव्यातील जनतेला स्वयंपूर्णतेची स्वप्ने दाखविली होती. गोवा मुक्तीची साठ वर्षे साजरी करताना गोवा स्वयंपूर्ण व्हायला हवा. गोव्यातील नागरिकांनी भाजी, मासे, चिकन, दूध अशा जीवनावश्यक वस्तूंवर आम्हाला शेजारी राज्यांवर अवलंबून रहावे लागते. प्रत्येक गावातील शेतकरी, दूधवाला, मच्छीमार या गोष्टी स्वंपूर्णतेने करु शकतो. स्वयंपूर्ण मित्र या पदाचा फायदा होण्यासाठी नव्हे तर प्रत्येक नागरिकाचे काम त्याने केले पाहिजे. आपला कल प्रत्येक गोवेकरासाठी एक शौचालय, घर, वाट, रस्ता, पाणी, आर्थिक सुरक्षा, आरोग्य सुरक्षा गोष्टी उपलब्ध करुन देण्याकडे. आपले सरकार अंत्योदय तत्वावर चालते. आपल्या सरकारच्या योजना प्रत्येक एका नागरिकापर्यंत पोहचवावे हे आपले कर्तव्य आहे.
आजपासून पाणी मोफत
आज 1 सप्टेंबरपासून गोव्यातील जनतेला ‘सेव्ह वॉटर-फ्री वॉटर’ या योजनेंतर्गत मोफत पाणी मिळणार आहे. विरोधक नाहक टीका करत आहेत. पूर्वीच्या सरकारने आपल्या कार्यकाळातील वीस वर्षे साधे पाणी उपलब्ध करुन दिले नाही. मला गोव्यातील वृद्धांची काळजी भासते म्हणून त्यांना पाणी मोफत उपलब्ध करुन देतो. ‘स्वयंपूर्ण गेवा’ करण्यासाठी अनेक योजना अजूनही आपण राबविणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
पाण्याची समस्या सुटणार
शिवोली मतदारसंघतील जनतेशी आपण संवाद साधला असता त्यांनी आपल्या समस्या आपल्या समोर मांडल्या. प्रत्येकाने पाण्याच्या अपुऱया पुरवठय़ाबद्दल माहिती दिली. येणाऱया दोन महिन्यांच्या आत शिवोली मतदारसंघातील पाण्याची समस्या सुटणार असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले. शिवोलीतील जनतेला रस्त्यांच्या समस्या भेडसावत आहे. रस्त्यांवर पाईपलाईन घालण्याचे काम चालू असल्या कारणाने हॉटमिक्सींग होऊ शकले नाही. येणाऱया नोव्हेंबर ते डिसेंबर या दोन शिवोलीतील प्रमुख रस्त्यांचे डांबरीकरण केले जाईल.
मांद्रेकर वीस वर्षे कार्यरत
शिवोलीचे माजी आमदार तथा माजी जलस्रोतमंत्री दयानंद मांद्रेकर यांनी आपल्या वीस वर्षांच्या कार्यकाळातील अनेक लोकांची कामे केलेली आहेत. शिवोलीतील जनतेला त्यांच्या कार्याची माहिती आहे. लोक मांद्रेकर यांच्या पाठीशी आहे. निवडणुकी अगोदर कुणाचेच नाव उमेदवारीसाठी घोषित केले जाणार नाही. निवडणुका जाहीर झाल्या की पक्ष उमेदवारीबाबत पक्ष योग्य तो निर्णय घेऊन नावे घोषित करतील.
तौक्ते वादळाच्या नुकसान ग्रस्तांना रीलीफ
मे महिन्यात झालेल्या तौक्ते वादळामुळे अनेकांना नुकसान सोसावे लागले. सरकारने आवाहन केल्यानुसार अनेकांनी अर्ज केले व त्यांना नुकसान भरपाई देण्यात आली. अजूनही कोणी अर्ज केले नाहीत ते अर्ज करु शकतात असे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.