नवी दिल्ली / वृत्तसंस्था
देशाचा विकास हेच केंद्रातील भाजप-रालोआ सरकारचे प्रमुख ध्येय आहे. मात्र, विरोधी पक्ष नकारात्मक मानसिकतेत गेले असून विकासकार्यात अडथळा निर्माण करणे हाच त्यांचा एकमेव कार्यक्रम आहे, अशी टीका भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जगतप्रकाश नड्डा यांनी केली. ते सोमवारी येथे पक्षाच्या नव्या कार्यकारिणीच्या प्रथम बैठकीत भाषण करीत होते.
कोरोनाच्या दोन्ही उद्रेकांमध्ये केंद्र सरकारने जीव ओतून काम केले. कोरोनामुळे अर्थव्यवस्था मंदावणे स्वाभाविक होते. गरीबांना याचा मोठा फटका बसला. मात्र, केंद्र सरकारने गरीबांसाठी अनेक उपयुक्त योजना क्रियान्वित केल्या. यात विनामूल्य धान्य योजना महत्वाची होती. यामुळे देशातील कोटय़वधी जनतेला आधार मिळाला. लसीकरण अभियानातही केंद्राने तत्परता दाखविली, अशी भलावण नड्डा यांनी केली. या बैठकीत पत्रकारांना प्रवेश नव्हता. त्यामुळे कार्यक्रमानंतर पक्षाचे उपाध्यक्ष रमण सिंग यांनी पत्रकारांना बैठकीची माहिती दिली.
भाजप कार्यकर्त्यांचे काम
कोरोना आणि इतर राष्ट्रीय आपत्तींच्या प्रसंगी भाजप कार्यकर्ते सर्वसामान्यांच्या साहाय्यासाठी धावून जातात. कोरोना उद्रेकातही याचे प्रत्यंतर आले आहे. भाजप कार्यकर्त्यांवर पक्षाचे असे संस्कार आहेत. समाजकारणाला राजकारणापेक्षाही वरचे स्थान देणारे कार्यकर्ते पक्षात आहेत. समजाच्या सुखदुःखात ते समाजाबरोबर असतात. त्यामुळे समाज भाजपबरोबर असतो, असे प्रतिपादन नड्डा यांनी केले.
काँग्रेसची दुर्दशा
जनतेशी नाळ तुटल्यामुळे काँग्रेसची दुर्दशा झाली आहे. जनतेच्या जिव्हाळय़ाचे प्रश्न हाती घेण्याची क्षमता हा पक्ष गमावून बसला आहे. भाजप कार्यकर्ते मात्र नेहमी जनतेच्या संपर्कात असतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी नेहमी ज्येष्ठ नेते आणि कार्यकर्त्यांशी पक्षाच्या प्रगतीसंबंधी चर्चा करतात. योग्य वेळी मार्गदर्शन करतात. गेल्या काही महिन्यांमध्ये त्यांनी पक्षाच्या संघटकांशी अनेकदा चर्चा केली आहे. नव्या कार्यकारिणीच्या स्थापनेतही ते सक्रीय राहिले आहेत, अशी माहिती नड्डा यांनी दिल्याचे भाजपचे उपाध्यक्ष बैजयंत पांडा यांनी स्पष्ट केले.