प्रतिनिधी/ बेळगाव
हिंडलगा, समर्थ कॉलनी, लक्ष्मीनगर येथे एका खासगी मोबाईल कंपनीचा टॉवर इमारतीवर उभारण्यात येणार आहे. यामुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्याला धोका असून या ठिकाणी टॉवर उभारू नये, अशी मागणी स्थानिकांनी हिंडलगा ग्रा. पं. कडे केली होती. परंतु नागरिकांचा विरोध पत्करून सोमवारी पुन्हा हा टॉवर उभारण्याचा प्रयत्न करण्यात आला. नागरिकांनी याला विरोध करून टॉवर उभारण्याचे काम सुरू केल्यास आंदोलनाचा इशारा दिला आहे.
समर्थ कॉलनी येथे उभारण्यात येणार असलेल्या टॉवरला नागरिकांनी विरोध करत 17 सप्टेंबर 2020 रोजी ग्राम पंचायतीला निवेदन दिले होते. या संदर्भात नागरिकांनी ग्रा. पं. पीडीओंशी संपर्क साधला असता ग्राम पंचायतीने टॉवर उभारण्यास कोणतीही परवानगी दिली नसल्याचे सांगितले. दुसरीकडे मोबाईल कंपनीचे कर्मचारी टॉवर उभारण्यासाठी ग्राम पंचायतीची परवानगी घेणे गरजेचे नसल्याचे सांगत आहेत. परंतु स्थानिकांचा विरोध असताना टॉवर उभारणे कितपत योग्य आहे, असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.
यापुढे या ठिकाणी टॉवर उभारणी करण्याचा प्रयत्न झाल्यास मोठे आंदोलन करण्याचा इशारा स्थानिक नागरिकांनी दिला आहे. यावेळी ग्रा. पं. सदस्या दळवी, अरुणा भातकांडे, कर्नल रमेश भट, मर्लिन फर्नांडिस, कॅप्टन प्रभाकर गवस, आरकॉज गोडद यासह परिसरातील नागरिक उपस्थित होते..