केंद्र सरकारचे निदर्शकांना आवाहन ः अग्निवीर भरती वयोमर्यादेत 23 वर्षांपर्यंत वाढ
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
अग्निपथ योजनेला विरोध करणाऱया निदर्शकांना आंदोलन सोडून भरतीची तयारी करण्याचे आवाहन केंद्र सरकारने केले आहे. संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी आंदोलक विद्यार्थ्यांना गोंधळ न घालण्याची सूचना केली. लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे यांनीही तरुणांनी अग्निवीर बनून भारतीय लष्करात भरती होण्याचे आवाहन केले आहे. लष्करप्रमुखांनी येत्या दोन दिवसांत लष्करातील भरतीची अधिसूचना जारी केली जाईल, असे स्पष्ट केले. हवाई दलाचे प्रमुख एअर चीफ मार्शल व्ही. आर. चौधरी यांनी अग्निवीरची हवाई दलातील भरती प्रक्रिया 24 जूनपासून सुरू होईल, अशी घोषणा केली आहे. याचदरम्यान, अग्निवीरांच्या भरतीची वयोमर्यादा दोन वर्षांनी वाढवत साडेसतरा ते 23 वर्षे अशी निश्चित केली आहे.
अग्निपथ योजनेवरून देशभरात गोंधळ सुरू आहे. 15 राज्यांत आंदोलने होत आहेत. अनेक ठिकाणी हिंसाचाराच्या घटना घडल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत. रस्त्यापासून रेल्वे ट्रक आणि बाजारपेठांपर्यंत शुकशुकाट आहे. निदर्शनांदरम्यान दोन जणांचा मृत्यू झाला आहे. अनेक आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अग्निपथ योजनेला उत्तर प्रदेश, बिहार, दिल्ली, पंजाब, हरियाणा, तेलंगणा, महाराष्ट्र, मध्यप्रदेश, पश्चिम बंगाल, राजस्थान, उत्तराखंड, छत्तीसगड, झारखंड, तामिळनाडू आणि हिमाचल प्रदेशमध्ये तीव्र विरोध सुरू असल्याचा अहवाल गृह विभागाला प्राप्त झाला आहे.
अग्निपथ योजनेला विरोध करताना अनेक राज्यांमध्ये आंदोलक रस्त्यावर उतरल्याने बऱयाच राज्यांमध्ये तणावाची स्थिती आहे. पोलिसांनी आंदोलकांना पकडण्याचा प्रयत्न करताच तरुणांनी पोलिसांवर दगडफेक केल्याचे प्रकारही निदर्शनास आले आहेत. अनेक पोलिसांवर दगडफेक झाल्यानंतर तरुणांना पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांडय़ा फोडल्या.
इंदूर रेल्वेस्थानकावर तरुणांचा गोंधळ
केंद्र सरकारच्या अग्निपथ योजनेला इंदूरमध्येही विरोध होत आहे. शुक्रवारी सकाळी येथील रेल्वेस्थानकावर पोहोचलेल्या तरुणांनी एकच गोंधळ घातला. या माहितीनंतर येथे कर्तव्यावर असलेल्या पोलिसांनी सौम्य बळाचा वापर केला. जवळपासच्या पोलीस ठाण्यांचा फौजफाटाही घटनास्थळी तैनात करण्यात आला आहे. येथे विद्यार्थ्यांनी चक्काजाम करत पुण्याहून इंदूरकडे येणारी टेनही अडवली. आंदोलनामुळे इंदूरहून उज्जैनला जाणाऱया मेमूसह दोन गाडय़ा रद्द करण्यात आल्या आहेत.
हरियाणामध्ये तोडफोड
हरियाणात शुक्रवारी सकाळी पुन्हा अग्निपथ योजनेला विरोध सुरू झाला. शुक्रवारी सकाळी नारनौल शहरातील बसस्थानकावर युवकांनी जोरदार निदर्शने केली आणि विरोधी घोषणाबाजी करत तोडफोड केली. त्यांना रोखण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केला. महावीर चौक आणि बसस्थानकावरून आंदोलक पांगले आहेत. पोलिसांनी 20 हून अधिक आंदोलकांना ताब्यात घेतले आहे.
भरतीची वयोमर्यादा 17.5 वर्षे ते 23 वर्षे
केंद्र सरकारने अग्निपथ योजनेंतर्गत भरतीसाठी उच्च वयोमर्यादा 21 वर्षावरून 23 वर्षे करण्याची घोषणा केली आहे. मात्र, ही सूट या वर्षासाठीच लागू असेल. संरक्षण मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, गेल्या दोन वर्षांत भरती न झाल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. यापूर्वी अग्निवीर होण्यासाठी वयोमर्यादा 17.5 वर्षे ते 21 वर्षे होती. अग्निपथ योजनेबाबत देशातील अनेक राज्यांमध्ये सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी हा निर्णय घेण्यात आला.
मालमत्तेचे नुकसान करू नका ः रेल्वेमंत्री
रेल्वेच्या मालमत्तेचे नुकसान करू नका, असे आवाहन रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी केले आहे. रेल्वे ही तुमची आणि देशाची संपत्ती आहे, कोणत्याही प्रकारे हिंसक आंदोलन करू नका. रेल्वेची मालमत्ता तुमच्या सेवेसाठी असल्यामुळे त्याचे अजिबात नुकसान करू नका अशी विनंती मी करतो, असे रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले.
वातावरण बिघडवण्याचे षड्यंत्र !
केंद्र सरकारच्या अग्निपथ या नव्या योजनेबाबत देशात प्रचंड गदारोळ सुरू आहे. अनेक राज्यांमध्ये हिंसाचार सुरू झाला आहे. बिहारला सर्वाधिक फटका बसला असून रेल्वेंना आग लावण्यात आली आहे. याचदरम्यान, केंद्रीय तपास यंत्रणांनी सर्व राज्यांना अलर्ट जारी केला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून अफवा पसरवून वातावरण बिघडवण्याचा डाव असल्याचे बोलले जात आहे. या संदेशाच्या माध्यमातून सुरक्षा यंत्रणांना अधिक सतर्क करण्यात आले आहे. तसेच सायबर यंत्रणेला सतर्क करत अफवा पसरवणाऱयांवर नजर ठेवण्याची सूचना करण्यात आली आहे.
हिंसाचारादरम्यान दोघांचा मृत्यू
अग्निपथ योजनेवरून सुरू असलेल्या गदारोळात आतापर्यंत दोन जणांना आपला जीव गमवावा लागला. पहिला मृत्यू तेलंगणात झाला. येथील सिकंदराबाद रेल्वे स्थानकावर दंगलीवेळी अनेक गाडय़ा पेटवून दिल्या. त्यांनी प्रवाशांवर दगडफेकही केली. प्रत्युत्तरादाखल पोलिसांनी लाठीचार्ज आणि गोळीबार केला. यामध्ये एका आंदोलकाचा मृत्यू झाला. दुसरीकडे, बिहारच्या लखीसरायमध्ये प्रचंड गोंधळ झाला. येथे आंदोलकांनी विक्रमशिला एक्स्प्रेस पेटवली. यामध्ये गुदमरल्याने एका प्रवाशाचा मृत्यू झाला.
लष्कर भरतीची अधिसूचना दोन दिवसात
देशभरात हिंसाचार सुरू असताना लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे यांचे मोठे वक्तव्य आले आहे. लष्कर भरतीची अधिसूचना दोन दिवसांत जारी केली जाईल, असे ते म्हणाले. भरतीसंबंधीची सर्व माहिती लष्कराच्या अधिकृत भरती पोर्टलवर उपलब्ध असेल. तरुणांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन लष्करप्रमुखांनी केले आहे.
एअरफोर्स भरतीसाठी 24 जून रोजी जाहिरात
अनेक राज्यांमधील गोंधळादरम्यान एअर चीफ मार्शल व्ही. आर. चौधरी यांनीदेखील लष्कराप्रमाणेच हवाई दलात भरतीसाठी यंदा वयोमर्यादा 21 ऐवजी 23 वर्षे असेल, असे स्पष्ट केले. यासोबतच भारतीय हवाई दलातील भरती प्रक्रिया 24 जून 2022 पासून सुरू होईल, असे त्यांनी सांगितले.