दोडामार्ग – वार्ताहर-
सध्या देशभरात मानवाच्या जीवन शैलीत अनेक बदल होताना दिसत आहेत. हे बदल होत असताना पर्यावरणावर याचा मोठ्या प्रमाणावर दुष्परिणाम होताना दिसत आहे. मुख्यत्वे मृदेवर म्हणजेच जमिनीवर दुष्परिणाम होऊन जमिनीची झीज होत आहे. ही होणारी झीज थांबविण्यासाठी प्रत्येक मानवाच्या जीवनशैलीत जागरूकता करणे गरजेचे आहे असे प्रतिपादन मंडळ कृषी अधिकारी एस. एस. सरगुरु यांनी केले.
संयुक्त राष्ट्राच्या महासभेत 5 डिसेंबर हा जागतिक मृदा दिवस साजरा करण्याचा संकल्प करण्यात आला. त्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील विर्डी या गावी जागतिक मृदा दिन साजरा करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. हा कार्यक्रम तालुका कृषी विभाग, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन व झुआरी कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर विर्डी सरपंच उत्कर्षा माजीक, झुआरी कंपनीचे मंदार सावईकर, वैभव बकले, सुमित दळवी, पोलीस पाटील सुनीता गवस, कृषी मित्र आनंद गवस आदी उपस्थित होते.
श्री. सरगुरु पुढे म्हणाले की, मृदेची होणारी झीज , ऱ्हास ही थांबविण्यासाठी फक्त शेतकऱ्यांमध्ये जागरूकता होणे आवश्यक आहेच पण सोबतच सामान्य नागरिकांमध्येही जागरूकता गरजेची आहे. या सोबतच शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे तसेच शेतीत नव – नवीन प्रयोग साधून आपली आर्थिक उन्नती साधावी असेही शेवटी स्पष्ट केले. मंदार सावईकर, वैभव बकले यांनी यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार कृषी साहाय्यक एच. एस. मोरे यांनी मानले.