महाडच्या आपत्ती व्यवस्थापनात सर्वोत्कृष्ट कार्य
ओटवणे / प्रतिनिधी:
महाडच्या महापुरातील आपत्ती व्यवस्थापनात मुंबई महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाचे विशेष कार्यकारी अधिकारी तथा विलवडे गावचे सुपुत्र सुभाष दळवी यांनी सर्वोत्कृष्ट कार्य केल्याबद्दल सुभाष दळवी यांचा रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्याहस्ते त्यांच्या कार्याचा सन्मान करण्यात आला. गेल्या २१ व २२ जुलैच्या महापुरानंतर महाडमध्ये सर्वत्र अर्धा ते एक फूट कचरा व गाळासह घाणीचे पसरलेले साम्राज्य पसरले होते. त्यामुळे महाडमध्ये रोगराई पसरून आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला होता. पुराच्या पाण्याबरोबर आलेल्या गाळ, कचरा, घाण व टाकाऊ वस्तू या सर्वांची विल्हेवाट लावणे आव्हान होते. मात्र आपत्कालीन परिस्थितीत मुंबई महापालिका नेहमीच धावून गेलेली आहे.
यासाठी मुंबईच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाचा नावलौकिक सर्वत्र आहे. त्यामुळे महाडवरील हे संकट दुर करण्यासाठी मुंबई महापालिकेचा घन कचरा व्यवस्थापन विभाग महाडच्या मदतीला धाऊन आला. या विभागाचे विशेष कार्यकारी अधिकारी तथा विलवडे गावचे सुपुत्र सुभाष दळवी यांच्या नेतृत्वाखाली महाडची ही स्वच्छता मोहीम २५ जुलै ते १ ऑगस्ट या अवघ्या आठ दिवसात फत्ते करण्यात आली. कोकणातील महाड वरील हे संकट निवारण्यासाठी कोकणच्या सुपुत्राचेच स्वच्छ्ता व्हिजन कामी आले असून त्यांच्या या नियोजनबद्ध नेतृत्वाचे त्यावेळी महाड दौऱ्यावर आलेल्या राज्यातील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह मंत्री एकनाथ शिंदे, आदित्य ठाकरे, रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे आणि स्थानिक आमदार व प्रशासनाने कौतुक केले होते.
पूरग्रस्त महाडमधून तीन हजार मेट्रिक टन कचरा उचलून शास्त्रोक्त पद्धतीने त्याची विल्हेवाट लावण्यात आली. मुंबई पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या २०० जणांचे पथकाने अद्ययावत सामग्रीसह महाड परिसर नियोजन पद्धतीने स्वच्छ केला. विशेष म्हणजे महाड मधील मूलभूत सेवा विस्कळीत झाल्या असताना प्रतिकूल परिस्थितीत हे कार्य केले. यावेळी सुभाष दळवी यांनी या पूर्वीच्या ओडिसा, भुज सांगली आदी ठिकाणचा आपला आपत्ती व्यवस्थापनाचा पूर्वानुभव वापरून आठ दिवसात महाडमधील रस्ते चिखलमुक्त करून जनजीवन पूर्वपदावर आणले. त्यांनी स्थानिक महाड प्रशासनासोबत रात्रंदिवस काम केले. सुभाष दळवी यांच्या नेतृत्वाखालील या कार्याची दखल घेऊन त्यांचा रायगड जिल्हा प्रशासनाच्यावतीने अलिबाग येथे सन्मान करण्यात आला.
सुभाष दळवी यांनी कोरोना संकट काळात मुंबई पालिकेच्या सर्व खातेप्रमुख अधिकारी, कर्मचारी, डॉक्टर, नर्स या सर्व कोरोना योद्ध्यांमध्ये सकारात्मक विचार रुजवून त्यांना ऊर्जा दिली. या सर्वांच्या कामात एकाग्रता, आत्मविश्वास व मनोबल वाढवण्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालून त्यांनी शेकडो ताण व्यवस्थापाबाबत कार्यशाळा घेतल्या. सुभाष दळवी यांच्या घराण्याला समाजसेवेचा वारसा लाभला असून विलवडे येथील माजी उपसभापती विनायक दळवी यांचे ते भाऊ होत.