प्रतिनिधी/ सातारा
नव्याने सातारा पालिकेच्या हद्दीत आलेल्या विलासपुर भागात आरोग्य विभागाचे दुर्लक्ष होत आहे.पालिकेने लक्ष देवून कोरोना प्रार्दूभाव कमी होण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब महामुलकर यांनी केलेली आहे. बाळासाहेब महामुलकर यांनी मुख्याधिकारी अभिजीत बापट यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की सातारा पालिकेच्या हद्दीत नव्याने समाविष्ठ झालेले विलासपुर आणि त्रिशंकू परिसरात कोरोना रोगाने थैमान घालतो आहे. विशेषतः फॉरेस्ट कॉलनी विलासपूरमध्ये अनेक लोकांना प्रादूर्भाव झालेला आहे. लोकांना काही समजेनासे झाले आहे. पालिकेचा टॅक्स भरण्यावर आघाडीवर असलेल्या या परिसरामध्ये कोणतेही नगरपालिकेची सुविधा उपलब्ध नाही. रुग्णांना कुठलीही औषधउपचाराबाबत सोय नाही. त्यांना कोणी वाली नाही. किडय़ामुंग्यासारखे लोकांचे जीव जात आहेत असल्या संकटात नगरपालिका प्रशासन डोळय़ावर पट्टी बांधून झोपले असेल तर त्यांना उठवून विलासपुर भागात तात्काळ कोरोना प्रतिबंधक उपाययोजना करण्यासाठी पाठवावे. येथील जनतेचे सगळे जीवनमान रामभरोसे झाले आहे. प्रत्यक्ष पाहणी करुन आवश्यक असल्यास कडक कारवाई करण्यात यावी. पुर्ण परिसर कंटेटमेट झोन करुन प्रार्दुभाव वाढू नये यासाठी पालिकेने प्रयत्न करावेत. त्याचबरोबर कोरोना प्रतिबंधक लस या परिसरातील नागरिकांना मिळवण्यासाठी विलासपूर ग्रामपंचायत कार्यालयात लसीकरण केंद्र करण्यात यावे. चांगल्या सुविधा मिळतील म्हणून पालिका हद्दीत येण्याचे लोकांनी मान्य केले. त्याचा पश्चाताप होवू नये असेच लोकांना वाटू नये की गडय़ा आपला गावच बरा, अशी टीप्पणीही त्यांनी केलेली आहे.