प्रतिनिधी/ पणजी
पर्वरी येथील विलास मेथर खूनप्रकरणाचे राजकारण केले जाऊ नये. पर्वरी पोलिसांनी या प्रकरणासह पैठण येथील बलात्कार व खूनप्रकरण तसेच 10 वर्षांपूर्वी घडलेल्या शमी उर्फ शालिनी अस्नोडकर खून प्रकरणाचा तपास नव्याने सुरु करावा, अशी मागणी श्री परशुराम गोमंतक सेनेच्यावतीने शैलेंद्र वेलिंगकर यांनी केली आहे.
विलास मेथर खूनप्रकरणी दबाव आणण्यासाठी पर्वरीत रॅली काढण्यात आली पण त्या ठिकाणी राजकारण अधिक झाले असे मत वेलिंगकर यांनी व्यक्त केले. या रॅलीत एक एन.जी.ओ.चा सदस्य प्रामुख्याने पुढे होता. सदर इसमाच्या इमारत बांधकाम ठिकाणी एका महिलेवर बलात्कार होऊन तिचा खून झाला. या प्रकरणाचा तपास अजून लागलेला नाही. सदर प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करणाऱयांना मेथर खूनप्रकरणी आवाज उठवण्याचा नैतिक अधिकार नसल्याचे ते म्हणाले.
शमी उर्फ शालिनी अस्नोडकर खूनप्रकरणही अशाच प्रकारे बंद करण्यात आले. या प्रकरणात ज्यांच्यावर आरोपी म्हणून संशय घेतला जात होता असे लोक आता मेथर खूनप्रकरणी काढलेल्या रॅलीत भाषणबाजी करीत होते. त्यांनाही नैतिक अधिकार नसल्याचे ते म्हणाले.
या प्रकरणांचा नव्याने तपास सुरु करावा अशी मागणी करताना गोव्यात कायदा आणि सुव्यवस्था कोलमडल्याचे ते म्हणाले. या पत्रकार परिषदेत सुनिल सांतीनेजकर आणि गजानन मुदगेकर हजर होते.