खानापूर तालुका म. ए. समिती बैठकीतील निर्णय : बेळगावात अधिवेशन घेण्याच्या निर्णयाचा निषेध
प्रतिनिधी /खानापूर
खानापूर तालुका म. ए. समितीने ऐक्य साधण्यासाठी दुसऱया गटाच्या अध्यक्षाना ऑगस्ट महिन्यात पत्र दिले होते. त्याला त्या गटाने तब्बल तीन महिन्यानी उत्तर दिले. मात्र त्या पत्रात वापरलेली भाषा व्यावहारिक नसल्यामुळे त्या पत्राला आमचा विरोध राहील, म. ए. समितीमध्ये विलीनीकरण नव्हे तर दोन्ही गटात ऐक्य साधण्यासाठी यापुढे देखील खानापूर तालुका म. ए. समिती सकारात्मक राहील, असा निर्णय सोमवारी तालुका म. ए. समितीच्या बैठकीत घेण्यात आला. अध्यक्षस्थानी तालुका म. ए. समितीचे अध्यक्ष माजी आमदार दिगंबर पाटील होते.
तसेच सीमाप्रश्नाची सोडवणूक शक्य तितक्या लवकर होण्यासाठी शरद पवार यांनी आणलेल्या तोडग्यानुसार हा प्रश्न सुटावा, यासाठी यापुढे देखील महाराष्ट्रातील विविध पक्षांच्या नेतेमंडळींच्या गाठीभेटी घेऊन यासंदर्भात पाठपुरावा पुढे सुरुच ठेवण्याचा निर्णयही बैठकीत घेण्यात आला. तसेच कर्नाटक सरकारने जाणीवपूर्वक बेळगावला विधीमंडळ अधिवेशन भरवण्याचा घेतलेला निर्णय आयोग्य असून त्याचा खानापूर तालुका म. ए. समिती तीव्र शब्दात निषेध करते. त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी त्याच दिवशी बेळगाव येथे म. ए. समितीच्यावतीने महामेळावा घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्या महामेळाव्यातही बहुसंख्येने उपस्थित राहण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.
या बैठकीत ज्येष्ठ नेते पुंडलिक चव्हाण, अर्जुन देसाई, विवेक गिरी, प्रकाश चव्हाण, विठ्ठल गुरव, डी. एम. गुरव, महादेव घाडी, बी. बी. पाटील, सरचिटणीस आबासाहेब दळवी, कार्याध्यक्ष यशवंत बिरजे तसेच म. ए. समितीचे अध्यक्ष माजी आमदार दिगंबर पाटील यांनी आपले विचार व्यक्त केले. बैठकीला म. ए. समिती कार्यकारिणीचे सर्व सदस्य उपस्थित होते.