पत्नी, मेहुण्या व साडवांविरुद्ध तक्रार : बजरंग दलाकडून कारवाईची मागणी : मुख्य सूत्रधारांचाही पर्दाफाश करा
प्रतिनिधी /फोंडा
गौरिश्वर नारायण कोठारकर या विवाहित तरुणावर धर्मांतर करण्यासाठी त्याची पत्नी, तीन मेहुण्या व साडवांकडून जबरदस्ती केली जात आहे. या संशयितांसह त्यामागील सूत्रधारांचा सखोल तपास करुन त्यांच्याविरुद्ध कडक कारवाई करण्याची मागणी विश्व हिंदू परिषद गोवा व बजरंग दलातर्फे करण्यात आली आहे. तक्रारदार गौरिश्वर हा मूळ आंगडी, माजाळी कारवार येथील असून सध्या सांताक्रूझ, पणजी येथे वास्तव्यास आहे.
याप्रकरणी गोवा पोलिसांच्या क्राईम ब्रँचकडे लेखी तक्रार नोंदविण्यात आली आल्याची माहिती बजरंग दलाचे ऍड. स्वप्नील कांबळी यांनी फोंडा येथे पत्रकार परिषदेत दिली. विश्व हिंदू परिषद गोवाचे अध्यक्ष संतोष महानंदू नाईक, मोहन आमशेकर, बजरंग दलाचे ब्रिजेश शुल्का, धर्म जागरण समितीचे अनिल शर्मा व तक्रारदार गौरिश्वर कोठारकर हे यावेळी उपस्थित होते.
सुरुवातील पैशांचे आमिष, नंतर जोरजरदस्ती
तक्रारदार गौरेश्वर कोठारकर हा गोव्यात एका फार्मास्युटिकल कंपनीत नोकरीला आहे. वर्षभरापूर्वी त्याचे लग्न झाले आहे. लग्न झाल्यापासून त्याची पत्नी, तीन मेहुण्या व साडवांकडून गौरिश्वर याच्यावर ख्रिस्ती धर्म स्वीकारण्याचा दबाव आणला जात आहे. शिवाय जोर जबरदस्ती चालल्याचे ऍड. काबंळी यांनी सांगितले. धर्मांतरास विरोध केल्याने त्याच्याविरुद्ध पत्नीचा हुंडय़ासाठी छळ चालवल्याची तक्रार कारवार पोलीस स्थानकात नोंदविण्यात आली आहे. तसेच त्याला धमक्याही दिल्या जात आहेत. तक्रारदार गौरिश्वर कोठारकर यांनी आपल्या तीन मेहुण्या व साडवांविरुद्ध तसेच त्यामागील काही सूत्रधारांवर क्राईम बँचकडे ही तक्रार नोंदविल्याची माहिती ऍड. कांबळी यांनी दिली. गोव्यासह कर्नाटक व महाराष्ट्रात पैशांचे आमिष दाखवून किंवा जबरदस्तीने धर्मांतराचे प्रकार सुरु असल्याचे त्यांनी सांगितले. गोव्यात असे रॅकेट कार्यरत असून त्यांच्याकडे या अवैद कार्यासाठी पैसा कोठून येतो याची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली. गौरिश्वर कोठारकर यांच्या तक्रारीची राज्य सरकारने गांभिर्याने दखल घेऊन या प्रकरणीचा सखोल तपास करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.
लग्नापूर्वीच पत्नीने केले होते धर्मांतर
तक्रारदार गौरिश्वर यांनी आपले लग्न सन 2020 मध्ये झाल्याचे सांगितले. आपली पत्नी व तिच्या तीन विवाहित बहिणी, भाऊ हे सर्व कुटुंबसदस्य ख्रिस्ती धर्मांत धर्मांतरीत झाले आहेत. लग्नापर्यंत त्यांनी आपल्याला याची कुठलीच कल्पना दिली नव्हती. त्यांनी आपली मूळ नावेही बदललेली नाहीत. लग्ना होऊन काही दिवसांनी पत्नी व मेहुण्यांकडून ख्रिस्ती धर्म स्वीकारण्यास आपल्याला प्रवृत्त करण्यास सुरुवात झाली. आपली आई व बहिणीनेही धर्मांतर करावे असा त्यांचा आग्रह होता. त्यासाठी पैसे व कारगाडी देण्याचे आपल्याला आमिष दाखविण्यात आले. पण आपण त्याला विरोध केल्याने आपल्याविरुद्ध हुंडय़ासाठी पत्नीचा छळ केल्याची तक्रार नोंदविण्यात आली. शिवाय धमक्याही दिल्या गेल्या. त्यांच्या पाठिशी धर्मांतर करणारे अन्य सूत्रधार गोव्यात कार्यरत असल्याचे गौरिश्वर यांनी सांगितले. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.
गोवा, महाराष्ट्र व कर्नाटकात धर्मांतर करणाऱया टोळय़ा
ब्रिजेश शुक्ला यांनी महाराष्ट्र राज्यात मुंबई, पुणे तसेच कर्नाटकात धर्मांतर करणाऱया टोळय़ा सक्रीय असल्याचे सांगून हिंदू धर्मियांवर ख्रिस्ती धर्म स्वीकारण्यास दबाव किंवा जोरजरदस्ती केली जाते. सुरुवातील पैशांचे आमिष दाखविले जाते. त्याला बळी न पडल्यास अन्य मार्ग अवलंबिले जातात. असे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत. धर्मांतराच्या या प्रकारांना आळा घालण्यासाठी कायदेशीर मार्ग अवलंबिला जाईल, असा इशारा त्यांनी दिला.