कोविड मार्गसूचीचे पालन होण्यासाठी सरकारची उपाययोजना
प्रतिनिधी/ बेंगळूर
राज्यात कोरोनाची दुसरी लाट येण्याचा धोका असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. विवाह समारंभांमध्ये कोविड मार्गसूचीचे उल्लंघन होत असल्याचे आढळून आल्याने आता सुरक्षा उपाययोजना म्हणून विवाह समारंभांमध्ये मार्शलची नेमणूक करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आरोग्यमंत्री डॉ. के. सुधाकर यांनी ही माहिती दिली आहे.
सर्व जिल्हाधिकाऱयांशी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे चर्चा केल्यानंतर पत्रकारांशी ते बोलत होते. विवाह समारंभांमध्ये येणारे नागरिक सामाजिक अंतर राखत नाहीत. आपण स्वतः अशा समारंभाना उपस्थिती दर्शविली होती. त्यावेळी आपणालाही मास्क काढण्यास सांगण्यात आले होते. त्यामुळे विवाह समारंभामध्ये एका मार्शलला पाठवून कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन होऊ नये यासाठी लक्ष ठेवण्यास सांगण्यात येईल. विवाह समारंभाला 500 पेक्षा अधिक जणांनी उपस्थित राहू नये. सर्वांनी मास्कचा वापर करावा. या नियमांच्या पालनासाठी ठोस उपाययोजना केल्या जातील. भोजन बनविणारे आणि वाढणाऱयांना देखील कोविड चाचणी करण्याची सूचना देण्यात आल्याचे ते म्हणाले.
सभा, समारंभ, आंदोलने यामध्ये कोविड मार्गसूचीच्या नियमांचे उल्लंघन होत आहे. अशांमुळे कोरोना संसर्गाचा फैलाव वाढल्यास आणखी कठोर कारवाई करण्याची परिस्थिती निर्माण होईल. महाराष्ट्रातील काही जिल्हय़ांमध्ये लॉकडाऊन जारी करण्यात आला आहे. ही परिस्थिती राज्यात येऊ नये, यासाठी सर्वांनीच जागरुक राहणे गरजेचे आहे, असा कानमंत्र मंत्री डॉ. सुधाकर यांनी दिला.