कडुनिंब हे संपूर्ण भारतात आढळणारे, नैसर्गिकरित्या उगवणारे, एक बहुपयोगी झाड आहे. याला लिंबाच्या रंगाची छोटी-छोटी कडू चवीची फळे लागतात म्हणून याचे नाव कडूलिंब. या झाडाची पाने, फळे, बिया, साल, मुळे सर्चव कडू असतात. गुढीपाडव्याच्या शुभ दिवशी याची कोवळी पाने, फुले, लहान कोवळी फळे, जिरे, मिरे, सैंधव मीठ, ओवा, गूळ, हिंग, चिंच हे सर्व एकत्र वाटून त्याची गोळी करून खातात. कढुलिंबाच्या झाडाची छाया थंड असते. त्या छायेतील घर उन्हाळय़ात थंड राहते.
गुणधर्म :
उन्हाळय़ामुळे गोवर, कांजिण्या या सारखे रोग उद्भवतात. अशावेळी रोग्याला कडुनिंबाच्या पानांच्या अंथरुणावर झोपवून मंत्र म्हणत असत.
धार्मिक महत्त्व :
मराठी वर्षाची सुरुवात चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजे गुढीपाडवा या दिवशी होते. त्या दिवशी गुढी उभी करताना कडुलिंबाच्या झाडाची डहाळी वापरतात तसेच त्या झाडाच्या फुलांची मिरपूड, मीठ, गूळ घालून केलेली चटणी खावी, अशी प्रथा आहे. चैत्र महिन्यात झाडांना नवी पालवी फुटते आणि उन्हाचा कडाका जाणवू लागतो. उन्हामुळे शरीरातील उष्णता वाढून नाना प्रकारचे आजार होतात. अशा आजारांचे प्रमाण कमी व्हावे आणि आपली प्रतिकारशक्ती वाढावी, आपले नवीन वर्ष आरोग्यपूर्ण जावे म्हणून आपल्या पूर्वजांनी पाडव्याला कडुलिंबाचे सेवन सांगितले आहे.
औषधी महत्त्व :
कडुलिंबाचा वृक्ष सगळय़ा दृष्टीने औषधी आहे. याची पाने, काडय़ा वाटून, त्याचा रस उन्हाळात प्राशन केल्याने उन्हाचा त्रास होत नाही. काही लोक हा पेलाभर रस रोज पितात. त्यामुळे लठ्ठपणा कमी होतो, सडसडीत माणसे सडसडीतच राहतात. कडुलिंबाच्या काडीने दात घासल्याने दात किडत नाहीत. दातांना बळकटी येते. कडुलिंबाची वाळलेली पाने धान्यात घातल्याने धान्याला कीड किंवा अळी लागत नाही. साबण, सौंदर्य प्रसाधने यात तसेच दंतमंजन, पेस्ट यामध्ये पण कडुलिंबाचा वापर करतात.
कडुलिंबाची झाडे जिथे जास्त प्रमाणात असतात तेथील हवा शुद्ध राहते. या झाडाच्या फळांचा रस काढून त्याचा वापर तेल काढण्यासाठी केला जातो. त्या तेलाचा उपयोग सांधेदुखी कमी होण्यासाठी करतात. मधुमेह या रोगामध्ये कडुलिंब अतिशय ऊपयुक्त आहे. रोज अर्धा कप रस प्यायल्याने मधुमेह नियंत्रित करता येतो.
यापासून बनणाऱया औषधी :
- कडुलिंब या झाडाची पाने खोबरेल तेलात काळी होईपर्यंत उकळायची आणि ते तेल नियमितपणे लावल्याने केसांची वाढ जोमाने होते. केसांच्या अनेक समस्या दूर होतात.
- पोटात जंत झाले तर पानांचा रस काढून एक चमचा रसात थोडा (अगदी चिंचोक्मयाएवढाच) गूळ घालून तीन दिवस प्याल्यास जंत बाहेर पडतात.
- अंगाला खाज सुटत असेल तर पानाचा रस सर्व अंगाला किंवा आंघोळीच्या गरम पाण्यात दहा -बारा कडुलिंबाची पान ठेचून घालावी.
- ताप आल्यास सकाळ-संध्याकाळ कडुलिंबाच्या सालीच्या काढा घेतात.
- कडुलिंबाची पान जखमेवर कुटून लावल्यास जखम लवकर बरी होते. निबोण्यांचे तेलही औषधी आहे. रक्त दुषित झाल्यावर त्वचेवर डाग पडतात तेव्हा हे तेल लावतात.
- सर्वात महत्त्वाचा उपयोग म्हणजे कडुलिंब हे अत्युत्तम जंतुनाशक आहे. याच्या पानांची पूड शेतात पसरल्यास खत म्हणून उपयोगी तर पडतेच पण त्यापेक्षाही रोपांना किडीपासून दूर ठेवते.
श्री आयुर्वेदाचार्य