अनेक नद्यांचे पाणी पात्राबाहेर : किनारपट्टीवरही मुसळधार पाऊस : शहरी भागातील जनजीवनही विस्कळीत
प्रतिनिधी /बेंगळूर
राज्यातील विविध जिल्हय़ांत गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस होत आहे. परिणामी, नद्यांचे पाणी पात्राबाहेर पडले आहे. संततधार सुरूच असल्यामुळे मलनाड भागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. पावसाचा जोर वाढल्यास मलनाड भागातील नद्यांची पाणीपातळी धोक्याबाहेर जाण्याची भीती व्यक्त होत आहे. जलाशयांमधील अंतर्गत पाण्याचा प्रवाह वाढल्यास विसर्ग वाढविण्यात येणार आहे. त्यामुळे नदीकाठावरील नागरिकांनी खबरदारी घ्यावी, अशी सूचना अधिकाऱयांनी केली आहे. तसेच खबरदारी म्हणून किनारपट्टीवरील मच्छीमारांना पुढील तीन दिवस समुद्रात न उतरण्याचा इशारा देण्यात आला आहे.
राज्यातील काही ठिकाणी वादळी वाऱयासह झालेल्या पावसाने अनेक झाडे उन्मळून पडली आहेत. तर काही ठिकाणी रस्ते, बंधारे पाण्याखाली गेली आहेत. बेळगावसह उत्तर कर्नाटकातील जिल्हय़ांत पावसाचा जोर वाढल्यामुळे नद्यांची पाणीपातळी वेगाने वाढत आहे. गेल्या 3-4 दिवसापासून पाऊस होत असल्याने चिकोडी तालुक्यातील चार बंधारे पाण्याखाली गेली आहेत. मलनाड भागात गेल्या 20 दिवसांपासून अधूनमधून पाऊस होत होता. मात्र, तीन दिवसांपासून कोप्प, एन. आर. पुरम, श्रुंगेरी आणि मुडिगेरे तालुक्यात पावसामुळे नद्यांच्या काठावरील शेती पाण्याखाली गेली आहे.
राज्यात उत्तम पाऊस होत असल्याने जलाशयांमध्ये मोठय़ा प्रमाणात पाणी वाहून येत असून काही नद्या तुडूंब भरल्या आहेत. किनारपट्टीवरील जिल्हय़ात ‘ऑरेंज अलट’& घोषित करण्यात आला असल्याने मच्छीमारांना पुढील 4-5 दिवस समुदात न उतरण्याची सूचना देण्यात आली आहे. पावसामुळे मलनाड भागातील लहान-मोठे धबधबे पुन्हा प्रवाहित झाले आहेत.
घटप्रभा नदीच्या पाणी प्रवाहात मोठी वाढ
बागलकोट, बेळगाव जिल्हय़ात पावसामुळे घटप्रभा नदीच्या पाणी प्रवाहात मोठी वाढ झाली आहे. मिर्जी गावच्या घटप्रभा रस्त्यावरील बंधारा पाण्याखाली गेला आहे. कृष्णा नदीच्या पाणी प्रवाहात मोठी वाढ आहे. दूधगंगा, वेदगंगा, हिरण्यकेशी नद्यांची पाणीपातळी वाढल्याने सुमारे अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. कोडगू जिल्हय़ात संततधार सुरूच असून नदीकाठावरील नागरिकांमध्ये पुराची भीती निर्माण झाली आहे. याचबरोबर कारवार जिल्हय़ातही मुसळधार पाऊस होत असल्याने दांडेली, हल्याळ तालुक्यातील बंधाऱयांवर पाणी आले आहे.
बेंगळूरसह राज्यातील शहरी भागातही पावसाचा जोर कायम असून अनेक सखल भागात पाणी साचले आहे. बेंगळूरमध्ये अनलॉक असल्याने अनेक जणांना कामावरून घरी परतताना रस्त्यांवर साचलेल्या पाण्यातून वाट काढावी लागत आहे. संततधार सुरूच असल्याने शहरी भागातील जनजीवनही विस्कळीत झाले आहे.
तुंगा जलाशयाचा अंतर्गत प्रवाह 33,700 क्युसेक
शिमोगा जिल्हय़ाच्या होसनगर आणि तीर्थहळ्ळी तालुक्यात नियमित पाऊस होत असल्याने लिंगनमक्की आणि भद्रा जलाशयांच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. गुरुवारी दुपारनंतर तुंगा जलाशयाचा अंतर्गत प्रवाह 33,700 क्युसेक इतका होता. गेल्या दोन आठवडय़ापासून उडुपीत संततधार सुरूच आहे.