प्रतिनिधी / पणजी :
गणेशोत्वाच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी राज्यात विविध ठिकाणी गणेश चतुर्थीच्या खास माटोळीच्या बाजारात खरेदीसाठी गर्दी दिसून आली. मात्र यावर्षी कोरोनासारख्या विषाणू रोगाविषयी आवाहन करण्यात आले, असतानाही गर्दीत वाढ होऊन सोशल डिस्टन्सिगचा फज्जा उडला आहे. गणेश चतुर्थीनंतर कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.
गणेश चतुर्थी हा गोमंतकीयांचा एकमेव उत्साही सण आहे. कोरोना व्हायरस हा नवीन संसर्ग असल्याने त्यासंबंधी उपचाराबाबत भारतीय वैद्यकीय क्षेत्रात संभ्रम आहे. या संसर्गापासून स्वत:चा बचाव करण्यासाठी शासानामार्फत गणेश चतुर्थी काळात विविध मार्गदर्शन तत्वे जाहीर केली आहेत. त्यात शारीरिक अंतर, मास्क घालणे हे अत्यंत महत्वाचे असतानाही बाजारपेठेमध्ये गर्दी होत आहे. राज्यातील विविध भागात माटोळीचा खास बाजार भरविण्यात आला आहे. ग्राहक किंवा व्यापाऱयांनी या दोन दिवसात याचे पालन न करता बिनधास्तपणे गर्दीत सजावटीचे साहित्य माटोळीला लागणाऱया वस्तू, किरणा व इतर वस्तू खरेदी केल्या आहेत. त्यात सोशल डिस्टन्सिगचे पालन झाले नसल्याने कोरोनाचा धोकाही वाढण्याची शक्यता आहे.
शहरातील मुख्य बाजारपेठेत न जाता ग्राहकांनी गाव पातळीवर गर्दी नसलेल्या लहान लहान आस्थापनावर जाऊन वस्तू खरेदी कराव्यात, असे आवाहनही विविध संस्था, शासनाकडून करण्यात आले आहे.