प्रतिनिधी / वैराग
अतिवृष्टीचे सरकारने पंचनामे न करता सरसकट जिरायत एकरी ५० हजार तर बागायतास १लाख रूपये लवकरात लवकर खातेवर जमा करावे, सर्वच पिकांना शंभर टक्के पिकविमा मंजूर करा, जामगाव – वाणेवाडी – कुसळंब रस्ता बनवा, मागील सन २०१८-१९ चा दुष्काळ निधी तात्काळ खातेवर जमा करा.
आदी मागण्यांसाठी शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष शंकर गायकवाड यांचे नेतृत्वाखाली बार्शी-लातूर रस्त्यावरील वाणेवाडी फाट्यावर सकाळी १० ते ११ असा सुमारे एक तास रस्ता रोको करण्यात आला त्यावेळी गायकवाड यांनी मागण्यांची पुर्तता लवकरच न झाल्यास राज्यभर रस्त्यावर उतरून आंदोलने केली जातील व मंत्र्यांनाही घराबाहेर पडणे मुस्किल केले जाईल असा खणखणीत इशाराही यावेळी दिला.
मागण्यांचे निवेदन तहसिलचे प्रतिनिधी विशाल नलवडे,आय्युब शेख यांना देण्यात आले त्यावेळी शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष शंकर गायकवाड, बापू गरदडे, समाधान यादव आदिंसह बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. आंदोलनाचा चोख पोलीस बंदोबस्त बार्शी तालुका पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरिक्षक शिवाजी जायपत्रे व त्यांचे सहकारी यांनी ठेवला होता.