प्रतिनिधी / बेळगाव
सहावा वेतन आयोग लागू करावा, या प्रमुख मागणीसह इतर मागण्यांसाठी मागील पंधरा दिवसांपासून पुकारलेला संप अखेर बुधवारी तूर्तास मागे घेण्यात आला. त्यामुळे गुरुवारी सकाळपासून विविध मार्गांवर बससेवा पूर्ववत सुरू झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांतून समाधान व्यक्त होत आहे. बुधवारी काही बसेस धावल्या असल्या तरी गुरुवारपासून बससेवा सुरळीत सुरू झाली आहे.
गेल्या पंधरा दिवसांपासून परिवहन कर्मचाऱयांनी संप पुकारला होता. त्यामुळे बससेवा ठप्प झाली होती. दरम्यान, प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी खासगी वाहतुकीला परवानगी देण्यात आली होती. बससेवा बंद राहिल्याने परिवहनला कोटय़वधी रुपयांचा फटका बसला. मात्र, परिवहनच्या संपाचा तिढा कायम होता. दरम्यान, उच्च न्यायालयाने यामध्ये हस्तक्षेप करून तातडीने संप मागे घ्यावा, अशा सूचना केल्या होत्या. या पार्श्वभूमीवर संप तात्पुरता मागे घेण्यात आला असून बससेवा सुरळीत सुरू झाली आहे.
गुरुवारी बेळगाव बसस्थानकातून सुळेभावी, होनगा, काकती, वडगाव, मजगाव, चंदगड, अनगोळ यासह ग्रामीण भागात बसेस धावल्या. तसेच कोल्हापूर, हुबळी, धारवाड, निपाणी, चिकोडी, संकेश्वर, हुक्केरी, बागलकोट, बैलहोंगल, सौंदत्ती आदी लांब पल्ल्यांसाठी बस धावल्या. मागील पंधरा दिवसांपासून बसस्थानकात थांबविण्यात येत असलेली खासगी वाहने बाहेर काढण्यात आली. त्यामुळे बसस्थानक पुन्हा एकदा बस आणि प्रवाशांनी गजबजलेले पाहायला मिळाले. बससेवा पूर्ववत सुरू झाली असली तरी कोरोनाने पुन्हा डोके वर काढल्याने नवी मार्गसूची जारी करण्यात आली आहे. त्यामुळे प्रवाशांना कोरोनाचे नियम पाळूनच प्रवास करावा लागत आहे.
बसस्थानकात बेळगाव आगारासह इतर आगारातील बस दाखल झाल्या होत्या. त्यामुळे प्रवाशांची संख्या वाढली होती. कोरोनाचा संसर्ग वाढल्याने सरकारने नवी मार्गसूची जारी केली आहे. त्यानुसार नाईट कर्फ्यू घोषित करण्यात आला आहे. मात्र, लांब पल्ल्यांच्या बस नाईट कर्फ्यूच्या काळातही धावणार आहेत. स्थानिक बस रात्री 9 च्या आधी बंद केल्या जाणार आहेत, अशी माहिती परिवहन विभागाच्या अधिकाऱयांनी दिली.
पंधरा दिवसांत 11.5 कोटींचा फटका
परिवहन कर्मचाऱयांनी पंधरा दिवस पुकारलेल्या संपामुळे बेळगाव विभागाला 11.5 कोटी रुपयांचा फटका बसला आहे. विविध मार्गांवर धावणाऱया बसच्या माध्यमातून परिवहनला उत्पन्न मिळते. मात्र, मागील पंधरा दिवसांत परिवहनच्या सर्वच बस जागेवर थांबून राहिल्याने उत्पन्नालाही ब्रेक लागला होता. त्यामुळे परिवहनला कोटय़वधी रुपयांचे नुकसान सोसावे लागले आहे.