प्रतिनिधी/ बेळगाव
कोरोना संकटात अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम झाला. अशा काळात वित्तसंस्था चालविणे म्हणजे कसरत होती. पतसंस्थेचे संचालक मंडळ आणि कर्मचारी यांनी सचोटीने व्यवहार करून ग्राहकांचा विश्वास संपादन करायला हवा, तरच अशा संस्था टिकतात व जोमाने चालू शकतात. विवेकानंद सोसायटीच्या कर्मचाऱयांनी ही जबाबदारी पेलून ग्राहकांना उत्तम सेवा देत संस्था नफ्यात आणली आहे. यामुळे सर्वचजण अभिनंदनास पात्र आहेत, असे गौरवोद्गार प्रा. आनंद मेणसे यांनी काढले.
कॉलेज रोड येथील विवेकानंद मल्टिपर्पज सौहार्द को-ऑप. सोसायटीचा दहावा वर्धापन दिन शनिवारी पार पडला. कोनवाळ गल्ली येथील लोकमान्य रंगमंदिर येथे झालेल्या कार्यक्रमात प्रा. आनंद मेणसे बोलत होते. ते पुढे म्हणाले, सामान्य माणूस केंद्रबिंदू मानून सहकार चळवळ सुरू झाली. ती यशस्वीपणे सुरू असली तरी आताही काही मर्यादा असतात. सावकारी पाशातून मुक्ती मिळविण्यासाठी सहकाराचा पर्याय निवडला पाहिजे, असे प्रा. मेणसे यांनी सांगितले.
लक्ष्मण पवार म्हणाले, कोरोना महामारीच्या संकटातही विवेकानंद सोसायटीने साधलेली प्रगती कौतुकास्पद आहे. संचालक मंडळ आणि कर्मचारी यांनी अथक परिश्रमाने भरारी घेतली आहे. सहकारात विश्वासार्हता सर्वात महत्त्वाची असून, विवेकानंद सोसायटीने ती जपली असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी व्हा. चेअरमन दत्ता नाडगौडा यांनी उपस्थितांचे स्वागत केले. चेअरमन अनिरुद्ध हुन्नरगीकर यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. किशोर काकडे व प्रिया कौठेकर यांनी मनोगत व्यक्त केले. सविता गवस यांच्या हस्ते मानसी शिरसंगी यांचा सत्कार करण्यात आला. संगीता कुलकर्णी यांनी संगीत कार्यक्रम सादर केला.