रेल्वेची उल्लेखनीय कामगिरी : शेतकरी अन् व्यापाऱयांना लाभ
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
कोरोना संकटकाळात भारतीय रेल्वेने मोठी कामगिरी फत्ते केली आहे. रेल्वेने पहिल्यांदाच विशेष पार्सल रेलवे विदेशात पाठविण्याची कामगिरी पूर्ण केली आहे. आंध्रप्रदेशच्या गुंटूर जिल्हय़ाच्या रेड्डीपेलम येथून मिरचीची खेप घेऊन एक विशेष पार्सल रेल्वे बांगलादेशच्या बीनापोल येथे पोहोचली आहे. आंध्रप्रदेशच्या गुंटूर आणि तेथील परिसरात मिरचीचे उत्पादन मोठय़ा प्रमाणात घेतले जाते. तेथील मिरचीचे पिक स्वाद आणि ब्रँडसाठी देशविदेशात प्रख्यात आहे.
शेतकरी आणि व्यापारी यापूर्वी रस्तेमार्गाने कमी प्रमाणात मिरचीचा पुरवठा बांगलादेशला करत होते आणि त्यांना प्रतिटन 7000 रुपयांचा खर्च येत होता. टाळेबंदीच्या काळात रस्तेमार्गाद्वारे मिरचीचा पुरवठा करणे शक्य झाले नव्हते. अशा स्थितीत रेल्वेच्या अधिकाऱयांनी शेतकऱयांशी संपर्क साधत वाहतूक सुविधेची माहिती दिली होती. पार्सल एक्स्प्रेसद्वारे 500 टन मिरचीची वाहतूक करता येत असल्याने गुंटूरच्या शेतकरी आणि व्यापाऱयांना मोठी मदत झाली आहे. अशाप्रकारे 16 पार्सल व्हॅन्स घेऊन एका विशेष पार्सल एक्स्प्रेसला बांगलादेशच्या बीनापोल येथे पाठविण्यात आले आहे. प्रत्येक पार्सल व्हॅनमध्ये सुक्या मिरच्यांच्या 466 पोती होत्या आणि त्यांचे एकूण वजन 19.9 टन इतके होते. विशेष पार्सल रेल्वेद्वारे सुमारे 384 टन मिरची बांगलादेशला पाठविण्यात आली आहे. प्रति टन मिरचीच्या वाहतुकीचा खर्च 4,608 रुपये आला आहे.