जादा दराने तिकीट आकारणी : प्रवाशांमधून व्यक्त होते नाराजी
प्रतिनिधी / बेळगाव
लॉकडाऊनचे नियम शिथिल केल्यानंतर हळूहळू सर्व व्यवहार पूर्वपदावर येऊ लागले आहेत. मध्यंतरी काही दिवस बंद असणारी रेल्वे वाहतूक पूर्ववत होत आहे. नियमित धावणाऱया रेल्वेगाडय़ांचे क्रमांक बदलण्यात आले असून त्यांना विशेष रेल्वेंचा दर्जा देऊन सध्या त्या धावत आहेत. परंतु या विशेष रेल्वेंचा प्रवाशांना मात्र आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. रेल्वे विभागाने या स्पेशल रेल्वेच्या तिकीट दरात वाढ केल्यामुळे पूर्वीचाच प्रवास अधिक तिकीटदर देऊन करण्याची वेळ प्रवाशांवर आली आहे.
कोरोनाचा प्रभाव वाढताच केंद्र सरकारने रेल्वे वाहतूक बंद करण्याचा निर्णय घेतला होता. यामुळे मध्यंतरी बरेच महिने रेल्वे वाहतूक पूर्णपणे ठप्प होती. परंतु अनलॉकची प्रक्रिया सुरू करत काही रेल्वेगाडय़ा प्रायोगिक तत्त्वावर स्पेशल रेल्वे म्हणून सोडण्यात आल्या. या रेल्वेंसाठी आगाऊ बुकिंग गरजेचे होते. सध्या बेळगाववरून बऱयाच रेल्वे पूर्ववत धावत असल्या तरी त्यांना विशेष दर्जा असल्यामुळे तिकीट दर अधिक आहेत.
…तर प्रवाशांना फायदा
ज्या मार्गांवर प्रवाशांची संख्या सर्वाधिक असते, किंवा वेटिंग लिस्ट जास्त असते, अशा मार्गांवर विशेष रेल्वे चालविल्या जातात. यामध्ये हॉलिडे रेल्वेचाही समावेश असतो. या विशेष रेल्वेला तिकीट दरही जादा आकारला जाते. परंतु सध्या नेहमीच्याच मार्गावर स्पेशल रेल्वे धावत असून, त्यांचे तिकीट दर वाढविले आहेत. स्पेशल रेल्वे येत्या अर्थसंकल्पामध्ये नियमित झाल्यास त्याचा फायदा प्रवाशांना होणार असल्याचे सिटीझन्स फोरमचे अध्यक्ष सतीश तेंडोलकर यांनी सांगितले.
स्पेशल रेल्वेमुळे सवलती बंद
रेल्वेतर्फे विविध वर्गातील 53 प्रवासी गटांना प्रवासादरम्यान तिकिटामध्ये सवलत देण्यात येत होती. यामध्ये दिव्यांग, कलाकार, खेळाडू, स्वातंत्र्यसैनिक यासह इतरांचा समावेश होता. परंतु कोरोना काळात सुरू करण्यात आलेल्या विशेष रेल्वेमधून प्रवास करत असताना रेल्वे विभागाने सवलती बंद केल्या आहेत. यामुळे या सर्वांना पूर्ण तिकीट काढून रेल्वेचा प्रवास करावा लागत आहे.
बेळगाव-मुंबई प्रवास 95 रुपयांनी महागला लॉकडाऊनपूर्वी बेळगाव-मुंबई प्रवासासाठी स्लिपर कोचचा तिकीट दर 230 रुपये होता. तो आता तब्बल 335 रुपये आकारला जात आहे. यामुळे स्लिपर कोचचा प्रवास 95 रुपयांनी महागला आहे. कोरोनामुळे गर्दी टाळण्यासाठी रेल्वे प्रशासनाने हा निर्णय घेतला असला तरी सर्वसामान्यांच्या खिशाला नाहक भुर्दंड बसत आहे.