प्रवाशांमधून मागणी : हुबळी-बेळगाव, बेळगाव-मिरज पॅसेंजर दीड वर्षांपासून बंदच : महसुलाद्वारे स्थिती सुधारण्यास मदत
प्रतिनिधी /बेळगाव
सर्वसामान्यांना परवडणाऱया दरात प्रवास करता येणारी पॅसेंजर रेल्वे मागील दीड वर्षांपासून बंद आहे. पॅसेंजरमध्ये होणाऱया गर्दीमुळे कोरोना वाढण्याचा धोका असल्याने त्या बंद ठेवण्यात आल्या आहेत. परंतु त्याच प्रवासाला तिप्पट पैसे खर्च करून नागरिकांना प्रवास करावा लागत आहे. हुबळी ते मिरज या दरम्यान धावणाऱया पॅसेंजर बंद असून सर्वसामान्यांचा प्रवास महागला आहे. इतर सर्व व्यवहार सुरू असताना केवळ पॅसेंजरमधूनच कोरोना पसरतो का? असा प्रश्न प्रवासी उपस्थित करीत आहेत.
कोरोनाचा धोका वाढल्याने 23 मार्च 2020 पासून पॅसेंजर बंद करण्यात आल्या. यामुळे सर्वसामान्यांचा बेळगाव शहरात येण्याचा मार्ग बंद झाला. हुबळी, कॅसलरॉक, लोंढा, खानापूर, गोकाक, घटप्रभा, रायबाग, कुडची, उगार खुर्द येथून दररोज शेकडो प्रवासी कामानिमित्त शहरात येतात. भाजीपाला, नोकरी, व्यवसाय, शिक्षण यासाठी ते येतात. परंतु पॅसेंजर नसल्याने या सर्वांनाच आर्थिक फटका बसत आहे. त्यामुळे हुबळी-मिरज मार्गावर पॅसेंजर सुरू करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
पॅसेंजरविना लोंढा-कॅसलरॉकवासियांचे हाल
मागील दीड वर्षांपासून पॅसेंजर बंद आहेत. त्यातच खानापूर-अनमोड या महामार्गाची दुरवस्था झाल्याने वाहनेही बंद आहेत. लोंढा, कॅसलरॉक परिसरातील 50-60 खेडय़ांचे लोक दररोज उदरनिर्वाहासाठी बेळगावला येतात. सध्या पॅसेंजर बंद असल्याने त्यांना मिळेल त्या वाहनाने अधिकचा खर्च करून शहर गाठावे लागत आहे. पुरुष कसेही करून कामाला येत असले तरी महिलांचे मात्र पुरते हाल होत आहेत. पावसाळय़ाच्या दिवसात परिसरात व्यवसायाविना नागरिकांवर उपासमारीची वेळ येत आहे.
एक्स्प्रेसचा प्रवास परवडेना
कोरोना येण्यापूर्वी बेळगाव-मिरज या दरम्यान पॅसेंजरचा प्रवास करण्यासाठी 25 ते 30 रुपये तिकीट दर होता. ज्ये÷ नागरिकांना अवघ्या 17 ते 18 रुपयांमध्ये हा प्रवास करता येत होता. परंतु आता एक्स्प्रेसने हाच प्रवास करण्यासाठी 75 ते 90 रुपये मोजावे लागत आहेत. अशीच स्थिती बेळगाव-लोंढा व हुबळी मार्गावर होत आहे. नागरिकांना 100 रुपये खर्च करून शहरात यावे लागत असल्याने सर्वसामान्य भरडले जात आहेत. बेंगळूर-बेळगाव (बेळगाव एक्स्प्रेस) एक्स्प्रेस बेळगावमध्ये आल्यानंतर पुढे पॅसेंजर म्हणून शेडबाळपर्यंत चालविली जात आहे. परंतु प्रवाशांच्या वेळेत पॅसेंजर नसल्याने तितकासा प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसून येत आहे.
पॅसेंजर सुरू झाल्यास आर्थिक स्थिती सुधारेल
अनलॉकनंतर राज्यातील सर्व व्यवहार सुरळीत सुरू आहेत. हुबळी, बेळगाव या जिल्हय़ांमध्ये कोरोना रुग्णसंख्या आटोक्मयात आल्याने कॉलेज, इतर व्यवसाय सुरू झाले आहेत. बेळगाव शहरात जिल्हा न्यायालय, हॉस्पिटल, शिक्षणसंस्था असल्याने नागरिकांना ये-जा करण्यासाठी पॅसेंजर सुरू करणे गरजेचे आहे. सध्या हुबळी-घटप्रभा मार्गावर पॅसेंजर सुरू झाल्यास रेल्वेला महसूल मिळून नागरिकांचीही आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत होणार असल्याचे सिटीझन कौन्सिलचे अध्यक्ष सतीश तेंडोलकर यांनी सांगितले.