भारताचा आघाडीवीर फलंदाज केएल राहुलचा उपांत्य फेरीतील न्यूझीलंडविरुद्धच्या अपयशाला उजाळा
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
‘गतवर्षी इंग्लंडमध्ये संपन्न झालेल्या आयसीसी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य फेरीत न्यूझीलंडविरुद्ध धक्कादायक पराभव स्वीकारावा लागला, त्या कटू आठवणी आजही मनात तितक्याच ताज्या आहेत. तो पराभव आजही आम्हाला खूपच सलतो’, असे प्रतिपादन भारताचा आघाडीचा फलंदाज केएल राहुलने केले. ‘मॅन बिहाईंड’ या चाट शोमध्ये केएल राहुल यावेळी बोलत होता.
त्या स्पर्धेत भारताने साखळी फेरीत अतिशय अव्वल दर्जाचे प्रदर्शन साकारले. पण, उपांत्य फेरीतील धक्कादायक पराभवासह संघाचे विजयाचे मनसुबे साफ धुळीस मिळाले. ही लढत मँचेस्टरमधील ओल्ड ट्रफोर्डवर मैदानावर झाली होती.
‘पूर्ण स्पर्धेत निर्विवाद वर्चस्व गाजवले असताना तेथे उपांत्य फेरीत अगदीच अनपेक्षित, अघटित घडले. कोणीच अशा प्रकारच्या पराभवाची कल्पनाही केली नसेल. आजही आमच्यातील बहुतांशी खेळाडू त्या पराभवातून सावरु शकलेले नाहीत’, असे केएल राहुल म्हणाला.
‘संघातील वरिष्ठ, अनुभवी खेळाडूंना कसे वाटले, याची मी कल्पना करु शकत नाही. पण, ज्यावेळी आयसीसी विश्वचषकासारख्या अव्वल स्तरावर मोक्याच्या क्षणी असा पराभव स्वीकारावा लागतो, त्यावेळी तो पचवणे सहजसोपे अजिबात असू शकत नाही. वास्तविक, पूर्ण स्पर्धेत आम्ही अतिशय उत्तम खेळलो होतो. त्यामुळे, त्या धर्तीवर असा पराभव स्वीकारावे लागणे शब्दशः स्वप्नभंग करणारे ठरले. आपल्याला आश्चर्य वाटेल. पण, आजही त्या पराभवाच्या आठवणीने अक्षरशः मध्यरात्री अचानक मला जाग येते’, याचा त्याने पुढे उल्लेख केला.
2019 आयसीसी विश्वचषकाच्या त्या स्पर्धेत सहभागी सर्व संघांच्या तुलनेत भारतानेच एककलमी वर्चस्व गाजवले. या अव्वल दर्जाच्या प्रदर्शनामुळे भारतीय संघ जेतेपदासाठी प्रबळ दावेदार म्हणून गणला गेला. साखळी फेरीत यजमान इंग्लंडविरुद्धचा पराभव वगळता भारताने अन्य सर्व सामने अपवाद वगळता दिमाखात जिंकले.
उपांत्य फेरीची लाईनअप निश्चित झाली, त्यावेळी भारत-न्यूझीलंड लढतीचे चित्र स्पष्ट झाले. त्यातही कागदावर भारताचा संघच सरस गणला गेला. पण, पावसाने व्यत्यय आणलेल्या त्या प्रत्यक्ष लढतीत हे सर्व आडाखे अक्षरशः धुळीस मिळाले. भारताला त्यात 18 धावांनी नामुष्कीजनक पराभव स्वीकारावा लागला आणि अर्थातच, संघाची विश्वचषकाची मोहीम देखील त्याचवेळी संपुष्टात आली.
उपांत्य फेरीतील त्या सामन्यात भारताची हाराकिरी कशामुळे?
गतवर्षी मँचेस्टरमधील ओल्ड ट्रफोर्डवर दि. 10 जुलै रोजी झालेल्या त्या उपांत्य सामन्यात पावसाचा जोरदार व्यत्यय आला आणि ही लढत दोन दिवसात विभागून खेळवावी लागली होती.
कर्णधार केन विल्यम्सन (95 चेंडूत 67), रॉस टेलर (90 चेंडूत 74) यांच्या धमाकेदार फलंदाजीच्या बळावर न्यूझीलंडने 50 षटकात 8 बाद 239 धावा केल्या, त्यावेळी अर्थातच हे लक्ष्य भारताच्या आवाक्यातील होते. पण, केएल राहुल (7 चेंडूत 1), रोहित शर्मा (4 चेंडूत 1), विराट कोहली (6 चेंडूत 1) हे आघाडीचे 3 फलंदाज अतिशय स्वस्तात बाद झाल्यानंतर भारताची 3 बाद 5 अशी दाणादाण उडाली. पुढे दिनेश कार्तिक 6 धावांवर बाद झाल्यानंतर 4 बाद 24 अशा रितीने अडचणीत आणखी भर पडली व त्यातून भारत अखेरपर्यंत सावरु शकला नव्हता.
धोनी (72 चेंडूत 50), रविंद्र जडेजा (59 चेंडूत 77) यांची सातव्या गडय़ासाठी 116 धावांची भागीदारी अपेक्षा उंचावणारी ठरली. पण, अंतिमतः भारताला 18 धावांनी पराभव स्वीकारावा लागला होता. आघाडीचे तीन अव्वल फलंदाज स्वस्तात बाद झाले, तोच जणू लढतीचा टर्निंग पॉईंट ठरला.