वृत्तसंस्था/ यान्क्टन
अमेरिकेतील यान्क्टन येथे झालेल्या विश्वचषक तिरंदाजी स्पर्धेत भारतीय तिरंदाजांनी पूर्ण निराशा केल्याने या स्पर्धेतून भारताला पदकविना मायदेशी परतावे लागत आहे.
भारताचे आंतरराष्ट्रीय तिरंदाजपटू अतानू दास आणि दीपिका कुमारी यांनी कांस्यपदकाच्या लढती गमावल्या. तुर्कीच्या विद्यमान ऑलिम्पिक विजेत्या मेटे गेझोझने अतानू दासचा 6-0 (27-29, 26-27, 28-30) असा पराभव केला. कांस्यपदकाच्या दुसऱया एका सामन्यात मिचेली क्रोपेनने दीपिका कुमारीचा 5-6 (6-9) असा पराभव केला. महिलांच्या विभागातील वैयक्तिक विभागात भारताच्या दीपिका कुमारीने रशियाच्या ऑलिम्पिक रौप्यविजेत्या स्वेतलाना गोम्बायेव्हाचा उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत 6-4 असा पराभव करत उपांत्य फेरीत स्थान मिळविले. पण त्यानंतर दीपिकाला उपांत्य लढतीत रशियाच्या ओसीपोव्हाने 6-2 असे पराभूत केल्याने दीपिकाचे या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. दीपिका आणि अतानू यांना कास्यपदकांनी हुलकावणी दिल्याने भारताला या स्पर्धेतून पदकविना परतावे लागत आहे.