आशियाई युवा व कनिष्ठ बॉक्सिंग स्पर्धा
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारताचे युवा बॉक्सर्स विश्वनाथ सुरेश (48 किलो गट) व आनंद यादव (54 किलो गट) यांनी दमदार प्रदर्शन करीत जॉर्डनमधील अम्मान येथे सुरू असलेल्या आशियाई युवा व कनिष्ठ बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये अंतिम फेरी गाठली.
दोघांनीही आपापल्या उझ्बेकच्या प्रतिस्पर्ध्यांवर सारख्याच पद्धतीने विजय मिळविला. दोघांनाही प्रतिस्पर्ध्यांकडून कडवा प्रतिकार झाला. विश्वनाथने या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत सलग दुसऱयांदा अंतिम फेरी गाठली आहे. त्याने उपांत्य लढतीत मिरालियन मावलोनोव्हवर 4-1 अशा गुणफरकाने विजय मिळविला. आनंदनेही चुरशीच्या लढतीत अब्दुवली बुरिबोएव्हवर 3-2 अशी निसटती मात केली. मागील वर्षी विश्वनाथला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले होते. पण यावेळी त्याला सुवर्ण मिळविण्याची पुन्हा एकदा संधी मिळाली आहे. त्याची सुवर्णपदकाची लढत किर्गिजस्तानच्या एर्गेशोव बेकझतशी होणार आहे तर आनंदची अंतिम लढत फिलिपाईन्सच्या एलाय पामिसाविरुद्ध होणार आहे.
रमनला मात्र 51 किलो वजन गटाच्या उपांत्य फेरीत उझ्बेकच्या खुजानाझर नोर्तोजिएव्हकडून 0-5 अशी एकतर्फी हार पत्करावी लागल्याने त्याला कांस्यपदकवर समाधान मानावे लागले. भारतीय बॉक्सर्सनी आतापर्यंत युवा विभागात 18 पदके निश्चित केली आहेत. त्यापैकी 12 महिला तर सहा पुरुष विभागातील आहेत. महिलांमध्ये सात भारतीयांनी अंतिम फेरी गाठली आहे.
कनिष्ठ मुलांच्या विभागात यशवर्धन सिंग (60 किलो गट), रिषभ सिंग शिखरवार (80 किलो) यांनी उपांत्य फेरीत विजय मिळवित अंतिम फेरी गाठली. याशिवाय जयंत डागर (54), चेतन (57), जॅक्सन सिंग लैशराम (70), देव प्रताप सिंग (75), गौरव म्हस्के (80 किलोवरील) उपांत्य फेरीत पराभूत झाल्याने त्यांना कांस्यपदक मिळाले. यशवर्धनने कझाकच्या ऍलेक्सी खावान्त्सेव्हचा 5-0, रिषभने किर्गिजस्तानच्या चोईबेकोव्ह अझिमचा 4-1 असा पराभव करून अंतिम फेरी गाठली. 13 व 14 मार्च रोजी अंतिम लढती होतील.