ऑनलाईन टीम/तरुण भारत
३१ जानेवारीचा दिवस संपूर्ण देशामध्ये विश्वासघात दिवस म्हणून शेतकऱ्यांकडून साजरा केला जातोय असं संयुक्त किसान मोर्चा या संघटनेनं म्हटलंय. सोमवारी संयुक्त किसान मोर्चाने राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना एक पत्र लिहिलं आहे. “तुम्हाला हे सांगताना आम्हाला फार दु:ख होतंय तसेच संतापही वाटतोय की पुन्हा एकदा शेतकऱ्यांसोबत विश्वासघात झालाय. भारत सरकारच्या ज्या ९ डिसेंबरच्या पत्राच्या आधारे आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला, त्यापैकी एकही आश्वासन सरकारने पूर्ण केलेलं नाही. त्यामुळे आज संपूर्ण देशभरामध्ये शेतकऱ्यांकडून ३१ जानेवारी २०२२ हा दिवस ‘विश्वासघात दिवस’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आलाय,” असं या पत्रात म्हटलंय. जर सरकारने लेखी स्वरुपामध्ये दिलेली आश्वासनं पूर्ण केली नाहीत तर शेतकऱ्यांकडे आंदोलन पुन्हा सुरु करण्याशिवाय कोणताही पर्याय उरणार नाही, असा इशाराही शेतकरी संघटनेनं दिलाय.