वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
मस्कतमध्ये सध्या सुरू असलेल्या 2022 विश्व टेबल टेनिस स्पर्धेत भारताची किमान दोन रौप्यपदके निश्चित झाली आहेत. या स्पर्धेत भारताच्या टेबल टेनिसपटूंनी मिश्र दुहेरीची अंतिम फेरी गाठली.
मिश्र दुहेरीच्या प्रकारात भारताचे मानव ठक्कर आणि अर्चना कामत तसेच महिलांच्या दुहेरीत एस. मुखर्जी आणि ए. मुखर्जी यांनी अंतिम फेरीत प्रवेश मिळविला.
मिश्र दुहेरीच्या उपांत्य लढतीत मानव ठक्कर आणि अर्चना कामत या जोडीने हंगेरीच्या नेनडोर इसेकी आणि लैला इमेरी यांचा 11-9, 11-7, 11-5 असा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश मिळविला. आता अंतिम फेरीत ठक्कर आणि कामत यांची लढत चीनच्या वेंग चुगीन आणि झिंगटाँग यांच्याबरोबर होणार आहे.
महिला दुहेरीच्या उपांत्य लढतीत एस. मुखर्जी आणि अहिका मुखर्जी या जोडीने आपल्याच देशाच्या श्रीजा अकुका आणि एस. सेल्व्हेकुमार यांचा 11-4, 11-6, 12-10 असा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश मिळविला.
एस. मुखर्जी आणि अहिका मुखर्जी यांचा अंतिम सामना चीनच्या तियानी आणि चेन यांच्याविरुद्ध होईल. उपांत्य फेरीत पराभव पत्करलेल्या भारताच्या श्रीजा अकुका आणि एस. सेल्व्हेकुमार यांना कांस्य पदकावर समाधान मानावे लागले. मिश्र दुहेरीत भारताच्या जी. साथियान आणि मनिका बात्रा यांना उपांत्यपूर्व फेरीत हार पत्करावी लागली.
महिला एकेरीमध्ये भारताच्या मनिका बात्राने उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळविले. तिने रुमानियाच्या झोकेसचा 11-3, 13-11, 11-8 असा पराभव केला. पण त्यानंतर मनिका बात्राला चीनच्या मेनकडून 9-11, 4-11, 3-11 अशी हार पत्करावी लागल्याने तिचे एकेरीतील आव्हान संपुष्टात आले.