वृत्तसंस्था/ अँटेलिया
येथे सुरू असलेल्या विश्वचषक स्टेज-1 तिरंदाजी स्पर्धेत पुरूषांच्या कंपांऊंड सांघिक प्रकारात भारताने सुवर्णपदक पटकाविले. या क्रीडाप्रकारातील शनिवारी झालेल्या अंतिम लढतीत भारताने फ्रान्सचा केवळ एका गुणाने पराभव केला.
पुरूषांच्या सांघिक कंपांऊंड तिरंदाजी प्रकारात भारताच्या अभिषेक वर्मा, रजत चौहान आणि अमन सैनी यांनी शानदार कामगिरी करताना फ्रान्सचा 174-173 अशा केवळ एका गुणाने पराभव करत सुवर्णपदक पटकाविले.
2017 साली शांघाय येथे झालेल्या विश्व तिरंदाजी स्पर्धेनंतर भारताने पुरूषांच्या कंपांऊंड सांघिक प्रकारात हे पहिले सुवर्णपदक मिळविले आहे. दरम्यान महिलांच्या कंपांऊंड मिश्र पेअर तिरंदाजी प्रकारात क्रोएशियाने कास्यपदकाच्या लढतीत भारताचा 157-156 अशा केवळ एका गुणाने पराभव केला. या लढतीत मुस्कान किरार आणि वर्मा भारताचे प्रतिनिधीत्व करीत होत्या. रविवारी या स्पर्धेत पुरूषांच्या मिश्र सांघिक पेअर तिरंदाजी प्रकारात भारताच्या तरूणदीप राय आणि रिधी पोर यांनी अंतिम फेरीत प्रवेश मिळविला आहे. उपांत्य फेरीच्या सामन्यात राय आणि पोर यांनी स्पेनचा 5-3 असा पराभव केला.