वृत्तसंस्था/ सोनेपत
टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत सहभागी झालेल्या भारतीय तिरंदाजपटूंची कामगिरी समाधानकारक न झाल्याने आता पुढील महिन्यात होणाऱया विश्व तिरंदाजी स्पर्धेसाठी नव्या तिरंदाजांची निवड करण्यात आली आहे. येथे घेण्यात आलेल्या निवडचाचणीत टोकियो ऑलिम्पिकमध्ये भाग घेतलेला एकही तिरंदाज पास होऊ शकला नाही.
टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत सहभागी झालेल्या भारताच्या चार तिरंदाजपटूंना पदकाविना मायदेशी परतावे लागले या स्पर्धेनंतर सदर भारतीय तिरंदाजपटू मायदेशी आल्यानंतर त्यांच्यासाठी दोन दिवसांची निवड चाचणी येथे घेण्यात आली. या चाचणीत पहिल्या तीन खेळाडूंमध्ये त्यापैकी एकालाही स्थान मिळविता आले नाही. भारताची टॉपसीडेड महिला तिरंदाज दीपिका कुमारी चौथ्या स्थानावर राहिली. हरियाणाची नवोदित 17 वर्षीय कोमलिका बारी, सिद्धी फोर आणि अंकिता भक्त यांनी निवड चाचणीमध्ये पहिले तीन क्रमांक पटकाविले. पुरुषांच्या विभागात पंजाबचा आदित्य चौधरी, महाराष्ट्राचा 19 वषीय पार्थ साळुंखे आणि 2014 च्या युवा ऑलिम्पिक स्पर्धेतील कांस्यपदक विजेता अतुल वर्मा यांनी निवड चाचणीमध्ये पहिले तीन क्रमांक पटकाविले. तरुणदीप रायने नववे, अतानू दासने सतरावे तर प्रवीण जाधवने 20 वे स्थान मिळविले. सोनेपतच्या साई केंद्रामध्ये द्रोणाचार्य आणि अर्जुन पुरस्कार विजेते तिरंदाज प्रशिक्षक संजीव सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवड चाचणी घेण्यात आली. आगामी विश्व तिरंदाजी स्पर्धा 19 ते 26 सप्टेंबर दरम्यान खेळविली जाणार आहे. या स्पर्धेसाठी भारताचे पुरुष आणि महिलांचे रिकर्व्ह संघ निवडण्यात आले आहेत. 2024 च्या पॅरिस ऑलिम्पिकसाठी भारतीय तिरंदाजांच्या पूर्वतयारीला आतापासूनच प्रारंभ करण्याचा निर्णय भारतीय तिरंदाज संघटनेने घेतला आहे.
रिकर्व्ह पुरुष संघ- आदित्य चौधरी, पार्थ साळुंखे, अतुल वर्मा. रिकर्व्ह महिला संघ- कोमलिका बारी, रिद्धी फोर, अंकिता भक्त, पुरुष कंपाऊंड संघ- अभिषेक वर्मा, संगमसिंग बिस्ला, ऋषभ यादव, महिला कंपाऊंड संघ- मुस्कान किरार, ज्योती सुरेखा वेन्नम आणि प्रिया गुर्जर.