अध्याय तेरावा
भगवंत सनकादिकांच्या चित्त आणि विषय वेगळे कसे काढावेत या प्रश्नाच्या उत्तरादाखल म्हणाले, मनुष्य स्वतःला कर्ता समजत असतो. मी कर्ता असून माझ्या कर्तृत्वाने मला विषय उपभोगायला मिळतात अशा विचाराने त्याचे अंतःकरण विषयी झालेले असते. त्यामुळे त्याचा अहंकार उसळून उठतो.आणि तो विषयांच्या नादाला लागून चित्ताला भुलवतो. चित्त भुलले की मनुष्य आत्मस्वरूपाला विसरतो. आत्मस्वरूपाचा विसर पडल्याने जीव आणि मन यांचे तादात्म्य दृढ होते.
जर चित्त जीवाचे स्वरूप असते, तर ते विषयावर लुब्ध झाले नसते. जीव आत्मस्वरूपाला विसरला असल्याने तो त्याच्या इच्छा अभिमानाने वाढवत असतो. खरं म्हणजे नित्य, शुद्ध, मुक्त आणि ज्ञानरूप असे जीवाचे स्वरूप आहे. पण अहंकारामुळे हे मिथ्या बंधन त्याने मागे लावून घेतलेले असते. ह्याकरिता अभिमान सोडून द्यावा, तेव्हाच सर्व बंधन तुटते आणि तो अभिमान जाण्याकरिता माझे भजन करावे. परंतु वैराग्याशिवाय माझी भक्ती निरर्थक आहे. वैराग्य म्हणजे संपूर्ण निरिच्छ अवस्था होय. म्हणून वैराग्यासह माझी भक्मती जेव्हा उत्पन्न होते तेव्हा हृदयामध्ये विषयाचे अस्तित्व मुळीच नसते आणि सर्व प्राणिमात्रांमध्ये भगवंत आहे ही भावना असते. म्हणून जीवाला माझ्या स्वरूपाची प्राप्ती होते. हीच वैराग्ययुक्त भक्ती होय. ती प्राप्त होईल तेव्हाच माझ्या स्वरूपात जीवाचा प्रवेश होईल. खरे म्हटले तर जीव हा मत्स्वरूपीच आहे. पण देहाभिमानामुळे तो वेगळा झालेला असतो. ह्याकरिता सदासर्वदा प्राणिमात्राच्या ठायी माझीच भावना ठेवली तर आपोआपच मत्स्वरूप प्राप्त होते. जीवाला मत्स्वरूप प्राप्त झाले की, विषय व चित्त ह्या दोघांचाही सहजी त्याग घडतो. आता तुम्ही म्हणाल की, विषय आणि चित्त दोघांचाही भास जर मिथ्या आहे तर जीवाला त्यांचे बंधन का पडते ? याचे उत्तर असे की, मनुष्य कायम विषयांचेच सेवन करीत राहिल्याने त्याचे चित्त विषयांचेच चिंतन करत असते. हे विषय त्यांच्या सततच्या चित्ताने केलेल्या चिंतनातूनच निर्माण होतात आणि चित्तामध्ये वतनदार होऊन बसतात. चित्ताला विषयांची अत्यंत प्रीति असतेच. त्यामुळे विषयासक्ति वाढते आणि ते एकदा विषयात घुसले म्हणजे मुळीच परत फिरत नाही. बुद्धीला विषयांचे ध्यान लागले आणि चित्तात विषयांचे चिंतन सुरू झाले, म्हणजे त्या विषयांसाठीच मन तळमळू लागते. तेणेकरुन विषयाभिमान उत्पन्न होतो. विषयामुळे अभिमान वाढतो आणि देहाला बंधन प्राप्त होते. तेच जीवाला अत्यंत कठीण, महाभयंकर व दुस्तर होते. तेव्हा मग त्या देहाचे जे विकार असतील ते तो खरोखर आपलेच मानतो. मी आंधळा, मी पांगळा, मी कोड भरलेला, मी स्वरूपाने सुंदर, मी ज्ञाता. देह तोच मी असे मानून आत्मस्वरूप विसरून जातो. जीवाला जे मिथ्याबंधन असते, तेच खरे असा त्याला अभिमान वाटतो. बुद्धिबळाच्या खेळातील जय आणि पराजय हे तेव्हढय़ापुरतेच असतात. त्या खेळातले घोडे-हत्तीही खोटेच असतात आणि मग ते मारले म्हणून खेळणारे लोक मात्र आपापसात भांडत बसतात. तो खेळ खेळणाऱयाला त्या खोटय़ा हत्ती घोडय़ांचा फार अभिमान वाटत असतो. त्याप्रमाणे जीवालाही देहाचा अभिमान वाटत असतो. त्या देहाच्या बळाने जीवालाही जन्माचे फेरे घ्यावे लागतात. हे जीवाचे बंधन नष्ट करण्यासाठी देहाभिमान निखालस सोडून द्यावा. अभिमान सोडला तर सहज माझे रूप प्राप्त होते. जीवाने माझी स्वरूपता साध्य केली की, विषय व चित्त ह्यांचा सहज त्याग घडतो. कारण माझ्या स्वरूपामध्ये अहंता आणि विषय यांची वार्तासुद्धा नाही. जेव्हा बुद्धिबळाचा डाव संपतो, तेव्हा राजा-प्रधान आदिकरून सारी मोहरी लाकडेच होतात. त्याप्रमाणे अहंकार नाहीसा झाला की, मग प्रपंचही मिथ्यत्वाने उडून जातो. स्वप्नातील बायका, मुले, आप्तइष्ट, द्रव्य आणि स्वतःचा देह ह्यांचा झालेला अभिमान जागेपणा प्राप्त होईल तेव्हा स्वतःच्या स्वप्नदेहासह मिथ्या होतो. त्याप्रमाणे माझे स्वरूप प्राप्त झाले की, मग देह कशाचा ? आणि अहंता कशाची ?
क्रमशः