कोल्हापूर/प्रतिनिधी
राजस्थानमधील कुख्यात ‘बिष्णोई’ टोळीकडून अंमली पदार्थ आणि शस्त्रांची तस्करी केली जात असल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे. या टोळीचे कोल्हापूर, सांगली आणि पुणे येथील कोणाशी कनेक्शन आहे काय? याचा शोध घेतला जाईल, अशी माहिती पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.
टोळीचा म्होरक्या शामलाल गोवर्धनराम पुनिया ऊर्फ बिष्णोईसह (वय 24, रा. भोजासर, जि. जोधपूर) त्याचा साथीदार श्रवणकुमार मनोहरलाल मांजू ऊर्फ विष्णोई (24, रा. विष्णुनगर, बारखी, ता. आसिया, जि. जोथपूर), श्रीराम पांचाराम विष्णोई& (23, रा. बेटलाईन जोथपूर) याच्या तिघांविरोधात पेठवडगाव पोलीस ठाण्यात बेकायदेशीर शस्त्र बाळगणे,गोळीबार करुन पोलिसांना ठार मारण्याचा प्रयत्न करणे, आदी गुन्हे दाखल झाले आहेत. संशयित श्रीराम बिष्णोई याला बुधवारी न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली. टोळीचा म्होरक्या शामलाल त्याचा साथिदार श्रवणकुमार या दोघांवर सीपीआरमध्ये उपचार सुरू आहेत. दोघांच्या प्रकृत्ती सुधारणा होत असून, हॉस्पीटलमधून डिस्चार्ज मिळताच त्यांना अटक केले जाईल, असे डॉ. देशमुख यांनी सांगितले. राजस्थान पोलीस दलाचे गुन्हे शाखेचे अधिकारी नरेंद्र पुनिया, कोल्हापूरचे अप्पर पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक तानाजी सावंत, पुलाची शिरोली औद्योगिक वसाहत पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण भोसले आदी उपस्थित होते.
राजस्थानचे पोलीस कोल्हापूरात
राजस्थानमधील कुख्यात ‘007 बिष्णोई’ टोळीतील तिघांना अटक केल्यानंतर राजस्थान पोलीस दलाचे गुन्हे शाखेचे अधिकारी नरेंद्र पुनिया आपल्या पथकासह बुधवारी कोल्हापूरात दाखल झाले. त्यांनी सीपीआरमध्ये जावून जखमी शामलाल व श्रवणकुमार या दोघांकडे चौकशी केली. त्यानंतर पोलीस अधीक्षक डॉ. देशमुख यांचाशी चर्चा केली. पेठवडगाव पोलीस ठाण्यात अटकेत असलेल्या श्रीराम विष्णोई& याच्याकडेही कसून चौकशी केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
राजस्थान पोलिसांनी जाहीर केले होते बक्षीस
टोळीचा म्होरक्या शामलाल याच्यावर दरोडा, जबरी चोरी, खूनाचा प्रयत्न, बलात्कार, बेकायदेशीर शस्त्र बाळगणे असे गंभीर स्वरुपाचे 12 गुन्हे दाखल आहेत. त्याचा साथीदार श्रीराम मांजु याच्याविरोधी 19 तर श्रवणकुमार याच्याविरोधी गंभीर स्वरुपाचे दोन तर दाखल आहेत. या तिघा गुन्हेगारांना पकडून देणाऱयास राजस्थान पोलिसांनी 20 हजार रुपये बक्षीस जाहीर केले होते.
‘कोल्हापूर पोलिसांची अभिमानास्पद कामगिरी’
पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक तानाजी सावंत आणि त्यांच्या पथकांने
प्रसंगावधान राखत कुख्यात टोळीला जेरबंद केले. त्यांची कामगिरी अभिमानास्पद आहे, असे गौरव उद्गार राजस्थान पोलीस दलाचे गुन्हे शाखेचे अधिकारी नरेंद्र पुनिया यांनी काढले. दरम्यान, या कामगिरीबद्दल शुक्रवारी गृह राज्यमंत्री तथा जिह्याचे पालकमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक तानाजी सावंत, पोलीस हेडकॉन्स्टेबल नामदेव यादव, पांडुरंग पाटील यांच्यासह पथकाचा सत्कार करण्यात येणार आहे.
टोळीच्या म्होरक्याची हुबळीत मालमत्ता
‘007 बिष्णोई’ नावाने टोळी तयार केली. या टोळीने राजस्थानमध्ये दहशत माजविली होती.टोळीचा म्होरक्या शामलालने याचे हुबळीमध्ये स्वतःचे घर, शेती आणि गॅस एजन्सी आहे. गेल्या तीन वर्षापासून जोधपूर पोलीस त्यांच्या मागावर होते. टोळीतील 15 जणांना जोधपूर पोलिसांनी अटक केली आहे. शामलालसह तिघेजण पसार होते. ते तिघे जण 20 जानेवारीला शामलालचा वाढदिवस साजरा करण्यासाठी हुबळीमध्ये येणार असल्याचे माहिती राजस्थान पोलिसाना मिळाली. शामलाल आपल्या दोघा साथीदारांसह हुबळी येथे वाढदिवस साजरा करण्यासाठी येणार असल्याच्या माहिती जोधपूर पोलीसांना मिळाली होते ते हुबळीत आले. शामलालचा साथीदार कारचालक श्रीराम बिष्णोई हा पोलिसांच्या निदर्शनास आला. मात्र तो हुलकावणी देवून पळून गेला. जोधपूर पोलीस मागावर असल्याची माहिती त्याने शामलाला दिली. त्याने आपल्या दोन साथीदारांसह कारमधून बेळगावचे दिशेने पलायन केले. तिघांना पोलिसांनी हुबळी टोलनाक्यावर अडविण्याचा प्रयत्न केला होता; पण ते तेथून निसटले होते. कोल्हापूर पोलिसांनी किणी टोलनाक्यावर त्यांच्या मुसक्या आवळल्या.
एका संशयितास 8 दिवसांची पोलीस कोठडी
पेठवडगाव ः टोळीतील श्रीराम विष्णोई याला वडगाव न्यायालयात हजर केले असता त्यास आठ दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली. मंगळवारी रात्री बिष्णोई टोळीतील गुंड व पोलिसांत चकमकीमध्ये श्रीराम हा किरकोळ जखमी झाला होता.