मुलांचा बुडून मृत्यू झाल्याने तलाव बनले धोकादायक : दुर्घटना टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना राबविण्याची गरज
प्रतिनिधी / बेळगाव
गणेशमूर्ती विसर्जनासाठी शहर आणि उपनगरात तलाव निर्माण करण्यात आले आहेत. मात्र विसर्जन तलावांच्या सुरक्षेच्या दृष्टीने महापालिकेने कोणतीच कार्यवाही केली नाही. परिणामी तलावांमध्ये लहान मुले बुडून मृत्युमुखी पडल्याच्या घटना मागील काही दिवसांमध्ये घडल्या आहेत. त्यामुळे विसर्जन तलावांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या घटना टाळण्यासाठी महापालिका आवश्यक उपाययोजना राबविणार का? असा मुद्दा उपस्थित करण्यात येत आहे.
शहर आणि उपनगरात साडेतीनशेहून अधिक गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात येते. गणेशमूर्तींचे विसर्जन यापूर्वी जुन्या कपिलेश्वर तलावात, छत्रपती शिवाजी उद्यानातील विहिरीमध्ये, जेल शाळा आवारातील विहिरीमध्ये आणि जुने बेळगाव येथील तलावामध्ये करण्यात येत होते. मात्र विहिरींचे पुनरुज्जीवन करून फिल्टर बसविण्यात आले आहेत. त्यामुळे शिवाजी उद्यान आणि जेल शाळा आवारातील विहिरींमध्ये गणेशमूर्ती विसर्जनास बंदी घालण्यात आली होती. तसेच कपिलेश्वर तलावात सर्व मूर्ती विसर्जन करण्यात येत असल्याने हा तलाव अपुरा पडू लागला. त्यामुळे कपिलेश्वर मंदिराशेजारील खुल्या जागेत विसर्जन तलाव निर्माण करण्यात आला. तसेच जुने बेळगाव, वडगाव, अनगोळ, कणबर्गी अशा विविध परिसरात विसर्जन तलाव बांधण्यात आले. याठिकाणी असलेल्या नैसर्गिक तलावांमध्ये गणेशमूर्ती विसर्जन करण्यात येत असल्याने पाणी दूषित होण्याचे प्रमाणही वाढले होते. त्यामुळे महानगरपालिकेने विसर्जन तलाव निर्माण केले होते.
गणेशमूर्ती विसर्जनाकरिता हे तलाव सोयीचे ठरले आहेत. तसेच सध्या प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती वाहत्या पाण्यात विसर्जित करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे महापालिकेने निर्माण केलेल्या विसर्जन तलावांमध्ये गणेशमूर्तीचे विसर्जन करण्यात येते. यादृष्टीने हे तलाव उपयोगी आहेत. मात्र तलावांची देखभाल आणि सुरक्षेच्यादृष्टीने महापालिकेने कोणत्याच उपाययोजना राबविल्या नसल्याने विसर्जन तलाव जीव घेणे बनले आहेत.
तलावांच्या सभोवती संरक्षक भिंत, तारेचे कुंपण नाहीच
वडगाव नाझर कॅम्प येथील विसर्जन तलावाशेजारील विहिरी कोसळल्याने तसेच तलावामध्ये कचरा टाकण्यात येत असल्याचे निदर्शनास आल्याने तलावावर जाळी बांधण्यात आली आहे. तसेच सुरक्षेच्यादृष्टीने आवश्यक खबरदारी घेण्यात आली आहे. मात्र कपिलेश्वर तलाव, जुने बेळगाव येथील तलाव, अनगोळ येथील तलाव आणि रामेश्वरतीर्थ येथील तलावाच्या सभोवती संरक्षक भिंत किंवा तारेचे पुंपण लावण्यात आले नाही. त्यामुळे हे तलाव धोकादायक ठरत आहेत. कपिलेश्वर मंदिराशेजारील तलाव सर्वात मोठा असून या तलावामध्ये पाण्याचे जिवंत झरे आहेत. त्यामुळे तलावामधील पाणी काढले असता हा तलाव पुन्हा पाण्याने भरतो. त्यामुळे या तलावामध्ये पोहण्यासाठी मुले उड्डय़ा मारत असतात. तसेच तलावाशेजारी खुली जागा असल्याने काही मुले या ठिकाणी क्रिकेट किंवा अन्य खेळ खेळत असतात. खेळताना चेंडू तलावात पडत असतो. त्यामुळे हा तलाव धोकादायक बनत आहे. या ठिकाणी चोहोबाजूंनी संरक्षक ग्रीलची उभारणी करून तलावामध्ये कारंजे निर्माण करण्याचा प्रस्ताव बुडाकडे देण्यात आला होता. मात्र बुडा आणि महानगरपालिकेने याबाबत कोणतीच कार्यवाही केली नाही.
जुने बेळगाव येथील मोठय़ा तलावामधील पाणी जनावरांना पाजण्यासाठी वापरण्यात येते. पण शेजारी असलेला विसर्जन तलाव खुलाच असतो. त्यामुळे या तलावामध्ये शाळकरी मुले पोहत असतात. या तलावाच्या सुरक्षेच्यादृष्टीने महापालिकेने कोणतीच उपाययोजना केली नाही. परिणामी विसर्जन तलाव धोकादायक ठरत आहे. मागील काही दिवसांमध्ये जुने बेळगाव आणि कपिलेश्वर तलावांमध्ये बुडून शाळकरी मुलांचा मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या होत्या. दोन्ही तलावांमध्ये दोन मुलांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे तलावांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. पहिल्यांदा कपिलेश्वर तलावात मुलगा बुडून मृत्युमुखी पडल्याची घटना घडली होती. वास्तविक पाहता त्याचवेळी सर्व तलावांभोवती संरक्षण कुंपण उभारण्याची गरज होती. मात्र महापालिकेने याकडे कानाडोळा केला. ही घटना घडलेल्या काही दिवसातच जुने बेळगाव येथील तलावामध्ये पोहण्यासाठी गेलेल्या मुलाचा बुडून मृत्यू झाला होता.
महापालिकेच्या अधिकाऱयांना आणखी किती मुलांचा बळी हवा?
या घटनेनंतरही महापालिकेच्या अधिकाऱयांना जाग आली नाही. अद्यापही तलावांच्या सुरक्षेच्यादृष्टीने कोणतीच कार्यवाही करण्यात आली नाही. तलावांच्या भोवती तारेचे कुंपण घालणे आवश्यक आहे. पण यासाठी पुढाकार कोण घेणार? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. त्यामुळे अनगोळ, कपिलेश्वर तलाव, कणबर्गी तलाव, जुने बेळगाव तलाव उघडय़ावरच आहेत. त्यामुळे महापालिकेच्या अधिकाऱयांना आणखी किती मुलांचा बळी हवा? असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.
पोहण्यास बंदी घालण्याची गरज…
या तलावांवर जाळी बांधण्याची तरतूद करण्यात आली आहे. सध्या कोरोनामुळे जलतरण तलाव पोहण्यासाठी बंद ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे शाळकरी मुले या तलावांमध्ये पोहण्यासाठी जात आहेत. पण तलावांतील अस्वच्छ पाणी आणि तलावाची बांधणी पोहण्यासाठी अयोग्य आहे. त्यामुळे तलावांवर जाळी बांधून पोहण्यासाठी बंदी घालण्याची गरज आहे. मात्र महापालिका प्रशासनासह अधिकाऱयांचे याकडे दुर्लक्ष झाले आहे. याबाबत महापालिका प्रशासनाने आवश्यक उपाययोजना राबवून अनर्थ टाळावेत, अशी मागणी होत आहे.