अध्याय नववा
अवधुतांचे म्हणजे दत्तगुरुंचे चोवीस गुरु आपण अभ्यासत आहोत. प्रत्येक व्यक्तीत गुण आणि अवगुण असतात आणि निरनिराळय़ा घटनांतून, प्रसंगातून आपल्या ते लक्षात येतात. आपण त्यांचा अवधुतांप्रमाणे अभ्यास करायला हवा. गुण घ्यावेत आणि अवगुण आपल्यात येऊ नयेत म्हणून खबरदारी घ्यावी असे अवधुतांचे तंत्र आहे आणि ते सर्वानाच लागू आहे. एकप्रकारे व्यक्तिमत्त्व विकासाचा हा अभ्यासक्रम आहे असे म्हणायला हरकत नाही. अशा प्रकारे केलेला आपल्या व्यक्तिमत्वाचा विकास आपल्याला स्वस्वरूपाची ओळख करून देणारा आहे आणि म्हणूनच अत्यंत महत्त्वाचा आहे हे आत्तापर्यंतच्या अवधुतांच्या गुरुंच्या गुणावगुणांचा अभ्यास केल्यावर आपल्या लक्षात येते.
अवधुतांची विसावी गुरु असलेल्या कुमारीने भात कांडताना बांगडय़ांचा आवाज येतो म्हणून फक्त एक बांगडी हातात ठेवून बाकीच्या बांगडय़ा काढून ठेवल्या. बघायला गेले तर हे सर्वत्र दिसणारे दृश्य. घटनास्थळी उपस्थित असलेल्या इतर लोकांनीही हे दृश्य पाहिले असेल आणि त्यात त्यांना विशेष असे काही वाटलेही नसेल कारण त्यातून काही बोध घेता येईल असे त्यांच्या लक्षात आले नसेल पण अवधुतानी घटनेची नोंद घेतली. त्यातून त्यांच्या लक्षात आले की हातातल्या बांगडय़ांची संख्या जसजशी कमी होत गेली तसतशी त्यांची होणारी किणकिण हळूहळू कमी झाली आणि हातात एकच बांगडी उरल्यावर पूर्णपणे थांबली. त्यावरून अवधुतानी असा बोध घेतला की जो एकटाच राहतो तो कलहापासून मुक्त होऊन एकाग्रता साधू शकतो. अवधूत पुढे म्हणाले की राजा तुला असे वाटत असेल की प्रतिस्पर्धी असलेले सारे राजे जिंकून, त्यांना आपले दास करून ठेवलेस, त्यामुळे मी मोठा समर्थ असून अजिंक्मय आहे तर ते चुकीचे आहे कारण जोपर्यंत कामक्रोधादिक शत्रूंचा सगळा वर्ग यथासांग जिंकल्याशिवाय तुझे ‘अरिमर्दन’ हे विशेषण योग्य होणार नाही. म्हणून कामादिक षड्रिपुना माझ्या उपदेशरुपी शस्त्राच्या धारेने हतवीर्य करून त्यांना वठणीवर आणशील, तेव्हाच तुला संसारात शत्रु नाही असे म्हणता येईल. पुढे उद्धवाने विचारले की, अवधूता तू केवळ एकटे राहणे पसंत करतोस आणि ती कन्या तर घरात राहणारी, तिचा एकांतातील वृत्तांत तुला कसा कळला? भगवंत म्हणाले त्याचे उत्तर ऐक, मी निर्जन अरण्यात राहून गुरुवचनावर विश्वास ठेवून आसनावर अढळ बसून ध्यानामध्ये निजतत्त्वाचे आकलन केले आहे. त्याच तत्त्वनिश्चयाकरिता मी या पृथ्वीवर फिरत असतो आणि जनात असो की वनात असो, निजात्मभावच दृढ करून मी पहात असतो. मला निरनिराळे प्रसंग दिसले तरी हे सर्व तात्पुरते आहे हे लगेच लक्षात येते. इतकेच नव्हे तर मी ती दृश्ये बघणारा कुणी वेगळा आहे असेही जाणवत नाही. अशा दृष्टीने मी फिरत असतो. याप्रमाणे गुरुत्वाचे गुण स्वीकारून जगाकडे पहात असताना मला चैतन्यभावच स्फुरू लागतो. अशा रीतीने मी फिरत असतो. थोडक्मयात मी ईश्वराचे सगुणरूपच आहे म्हणून मला आत्मदृष्टी प्राप्त झालेली आहे. त्या आत्मदृष्टीने चराचर सृष्टीत फिरत असताना अकस्मात मी त्या मुलीच्या घरी पोचलो. हे चतुरा! आपला हेतु सिद्धीस नेण्याकरिता या मुलीने बांगडय़ाचा आवाज कमी करण्यासाठी काय युक्ती केली ते पाहून मी चकित झालो. तिच्या हुषारीचे मला मोठे कौतुक वाटले. तिच्या आवाज नाहीसा करण्याच्या युक्तीवरून मी कोणता बोध घेतला ते ऐक. ज्या ठिकाणी पुष्कळ लोक वास करतात, तेथे अनिवार कलह माजून राहतो. इतकेच नव्हे, तर दोघेच असामी जरी एकांतात बसले, तरीसुद्धा अनेक प्रकारच्या गोष्टी करू लागतात. जेथे गोष्टींमध्येच वेळ जातो, तेथे आपला स्वार्थ असा काहीच साधत नाही. म्हणूनच पहा! मी हा एकटाच फिरत असतो आणि असे एकटे असताना एकाग्रता साधली तर मोठा लाभ हाताला येतो, जेव्हा परमात्म्यामध्ये मन स्थिर होते तेव्हा ते हळूहळू कर्मवासनांची धूळ झटकून टाकते. होता होता सत्त्वगुण वाढून रजतम नाहीसे होतात एकाग्रतेचे महत्त्व मी एका बाण तयार करणाऱया माणसाकडून शिकलो. म्हणून मी त्याला पुढील गुरु करून घेतले.