ऑनलाईन टीम / लेह :
विस्तारवादाचे दिवस गेले, आता विकासयुगाचे युग सुरू झाले आहे. वेगाने बदलणाऱ्या काळात विकासयुगच प्रासंगिक आहे, असे खडे बोल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चीनला सुनावले.
भारतीय सैन्यांचे मनोबल वाढविण्यासाठी मोदींनी आज लेह-लडाखला आज अचानक भेट दिली. त्यांनी लेहमधील नीमूला येथे रुग्णालयात जात जखमी जवानांची भेट घेतली. गलवान खोऱ्यात शहीद झालेल्या 20 जवानांनाही त्यांनी श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर त्यांनी लष्कर, वायूदल आणि आयटीबिपीच्याच्या जवानांना संबोधित केले.
मोदी म्हणाले, गेल्या काही काळात विस्तारवादाने मानवतेचा विनाश करण्याचे काम केले. मात्र, आता विस्तारवादाचे दिवस संपले असून, जग विकासाच्या दिशेने वाटचाल करत आहे. भारतमातेच्या रक्षणासाठी जवानांचे समर्पण अतुलनीय आहे. आज प्रत्येक भारतीयाची छाती शौर्य आणि पराक्रमामुळे फुगलेली आहे. 14 कोअरचे शौर्य सगळीकडे पसरले आहे. संपूर्ण जगाने तुमचे अदम्य साहस पाहिले आहे. भारतीय जवानांचे साहस पर्वतांपेक्षा मोठे आहे, असेही मोदी म्हणाले.