तरुण भारत संवाद प्रतिनिधी / सोलापूर
पत्नीवर असलेल्या संशयातून प्राध्यापक पतीने पत्नीला विहिरीत ढकलून देऊन खून केल्याप्रकरणी जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.एस. जगताप यांनी आरोपीला जन्मठेप व 10 हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली. विशेष म्हणजे ही घटना अकस्मात असून, तो एक अपघात असल्याचा आरोपीचा बनाव उघडा पडला.
या खटल्याची हकीकत अशी की, मोहोळ तालुक्यातील नरखेड येथील सीमा चंद्रकांत मोटे यांचा विवाह आरोपी वैभव कालिदास मगर (वय 27, रा. खुनेश्वर ता. मोहोळ) याच्याशी 2009 मध्ये झाला होता. आरोपी स्वतः उच्चशिक्षित असून, तो तेरणा येथील अभियांत्रिकी महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून ज्ञानदानाचे काम करीत होता. लग्नानंतरच्या चार वर्षात दोघांमध्ये कोणाताही वाद अथवा तंटा नव्हता. त्यानंतर मात्र तो सीमा यांच्या चारित्र्यावर संशय घेऊन, शारिरीक व मानसिक त्रास देऊ लागला. तसेच मद्यप्राशन करुन सतत मारहाण करीत होता, शिवाय जीवे मारण्याची धमकीही देत होता. आरोपीकडून होणारा त्रास व त्याच्याकडून दिल्या जाणाऱया धमकीबाबत सीमा यांनी माहेरी माहिती दिली होती. त्यानंतर सीमा यांच्या आई वडिलांनी आरोपी वैभवची समजूतही काढली होती.
यानंतर 21 ऑगस्ट 2016 रोजी आरोपी स्वतः दुचाकी घेऊन सीमा यांना घेण्यास आला होता. नांदायला घेऊन जातो असे सांगून, त्याने सीमा यांना दुचाकीवर बसवले. परंतु, खुनेश्वर गाव परिसरातील तात्या सोपान डेंगरे यांच्या रस्त्यालगत असलेल्या विहिरीत त्याने सीमा यांना ढकलून दिले. तत्पूर्वी त्यांच्यात रस्त्यावरच वाद झाला होता, ही बाब साक्षीदाराने न्यायालयात सांगितली होती. यासर्व घटनेनंतर आरोपीने त्याच्याकडील दुचाकी विहिरीत ढकलण्याचा प्रयत्न करीत असताना, तोही विहिरीत पडला होता.
याप्रकरणी सीमा यांचे वडील चंद्रकांत यांनी सुरुवातीला पोलीस ठाण्यात अकस्मात मयत म्हणून नोंद केली होती. यानंतर पुन्हा आठवडा भराने त्यांनी आरोपी वैभव विरुद्ध मुलीचा विहिरीत ढकलून देऊन खून केल्याप्रकरणी तक्रार दिली होती. या गुह्याचा तपास आर. जी. राठोड यांनी करुन न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. सरकारतर्फे 8 साक्षीदार तपासण्यात आले. या खटल्यात सरकारतर्पे दाखल केलेले विविध पुरावे, साक्षीदारांच्या साक्षी तसेच त्यांनी केलेला युक्तीवाद ग्राह्य धरुन न्यायालयाने आरोपी वैभव यास जन्मठेप आणि 10 हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली. या खटल्यात सरकारतर्फे ऍड. प्रदीपसिंग राजपूत, मुळ फिर्यादीतर्फे ऍड. बी. डी. कट्टे व आरोपीच्या वतीने ऍड. मिलिंद थोबडे यांनी काम पाहिले.
पत्नीला वाचविणे त्याचे कर्तव्य होते
रस्त्याच्या कडेला असलेल्या विहिरीत दुचाकीसह पडल्यानंतर आरोपी प्राध्यापक पती वैभव मगर हा विहीरीतून बाहेर आला. त्याला पत्नी सीमा यांना पोहायला येत नसल्याची माहिती होती. तरीही त्याने पत्नीला पाण्यातून बाहेर काढण्याचा कोणताच प्रयत्न केला नाही. ते त्याचे कर्तव्य होते, उलट स्वतःच्या उपचाराकरीता तो पत्नीला विहीरीतील पाण्यात सोडून तसाच निघून गेल्याची बाब खटल्याच्या सुनावणी दरम्यान जिल्हा सरकारी वकील ऍड. राजपूत यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून िदली.