दसरा, दिवाळीची चाहूल लागली आहे. नवरात्रीची शक्तीपूजा सुरू आहे. आता खंडेनवमी, शस्त्रपूजन पाठोपाठ दिवाळीचा उत्सव. यंदा सर्वदूर पाऊस चांगला झाला आहे. पाऊस, महापूर, ढगफुटीचे तडाखेही बसले आहेत. पण, देश असा विचार करताना पिक, पाऊस, पाणी चांगले आहे. कोरोनाचे घोंगावणारे संकट काहीसे मंदावले आहे. भारताने लसीकरणात जी गती घेतली आहे ती वाखाणण्याजोगी आहे. आज आपण कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत आघाडीवर आहोत आणि अन्य देशांनाही लसीचा पुरवठा करत आहोत. जग आणि देश संकटात असताना भारताने केलेली ही कामगिरी निश्चितच भारताचे सामर्थ्य, क्षमता आणि दृष्टी यांचे दर्शन घडविणारी आहे. पण, अजून धोका संपलेला नाही. संयम, काळजी नियमांचे पालन व लसीकरण पूर्ण करणे अत्यावश्यक आहे. काही मंडळी दुसरी लस घेण्याचा निरोप आला पण, लस घ्यायला गेले नाहीत असे दिसते आहे. एक चांगला नागरिक म्हणून ही गोष्ट योग्य नाही. शंभर टक्के लसीकरण पूर्ण झाले पाहिजे. महाराष्ट्र शासनाने कवचकुंडले असे नाव घेऊन मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेला प्रतिसाद देत लोकांनी संधीचा फायदा घेतला पाहिजे. प्रारंभीच्या काही काळात लस उपलब्धता कमी होती पण, सध्या कोठेही लसीची टंचाई नाही सर्व शासकीय दवाखाने, आरोग्य केंद्रे व खासगी दवाखाने येथे लस उपलब्ध आहे. वीस लाभार्थी आले की तातडीने लस दिली जाते. आता लसीसंदर्भात कोणतेही गैरसमज बाळगण्यात अर्थ नाही. कित्येक कोटी लोकानी लस घेतली व कोरोना प्रतिबंधक कवचकुंडल पांघरले. त्यांना कोणताही त्रास झाला नाही. लस घेतलेल्यांना अत्यल्प प्रमाणात पुन्हा लागण झाली पण, मृत्यू ओढावला नाही. असे रेकॉर्ड आहे. या साऱया पार्श्वभूमीवर कोरोना संकट मंदावते आहे आणि दसरा दिवाळीचे प्रकाशपर्व सामोरे आहे. कोरोना नंतरच्या काळात भारताने सुधारणांसाठी जी पावले टाकली आहेत ते अनेक अर्थाने देशाला पुढे नेणारी आहेत. संयुक्त राष्ट्रसंघात भारताचे स्थायी प्रतिनिधी टी. एस. तिरूमूर्ती यांनी या सुधारणांचा उल्लेख करत भारत सर्वात पुढे आहे असे सांगितले आहे. कोरोनाची आपत्ती त्यानंतरची लवचिकता आणि फेरउभारणी व सन 2030 पर्यंतच्या कार्यक्रमांना गती देण्यात भारताने लाक्षणिक प्रगतीची पावले टाकली आहेत. जागतिक पातळीवरील विध्वंसक गट व काही अतिरेकी संघटना या कामगिरीला धक्का देण्याचा प्रयत्न करीत आहेत. संकटावर मात करण्याच्या प्रयत्नांना आव्हान देते आहेत. याकडे लक्ष वेधून त्यांनी दहशतवाद विरोधी नेटाने लढावे लागेल असे म्हटले आहे. एकीकडे कोरोनाचे संकट मंदावते आहे. दुसरीकडे प्रागतिक पावले टाकली जात आहेत. याच जोडीला प्रकाशपर्व सुरू होत असताना देशात अभूतपूर्व वीज संकटाची चाहूल लागली आहे. अमेरिका, चीन, ब्रिटन आदी राष्ट्रात पेट्रोल आणि इंधन टंचाईने कळस गाठला आहे. आपल्याकडेही इंधन दरवाढीने कळस गाठला आहे. पेट्रोलने दराची शंभरी केव्हाच पार केली आता डिझेलच्या दरानेही शंभरी पार केली आहे. याच जोडीला आता वीज टंचाईचे संकट घोंगाऊ लागले आहे. जागतिक स्तरावर कोळसा दरात सुमारे चाळीस टक्के वाढ झाली आहे. वीजनिर्मितीचा खर्च वाढला आहे. देशाची कोळसा आयात निच्चांकी पातळीवर आहे. ओघानेच कोळसा टंचाई व त्यातून वीज टंचाई निर्माण झाली आहे. भारतात सुमारे 135 औष्णिक ऊर्जा निर्मिती प्रकल्प आहेत. यातील निम्म्याहून अधिक प्रकल्पाकडे केवळ दोन चार दिवस पुरेल इतकाच कोळसा शिल्लक आहे. देशात जो विजेचा वापर आहे त्यातील सत्तर टक्के वीज कोळसा वापरून तयार केली जाते. सौरऊर्जा आणि कोयना सारखी धरणे बांधून त्यावर जलविद्युत निर्मिती याबाबत आपण मागे आहोत. कोरोना काळात बंद असलेले अनेक उद्योग व्यवसाय आता सुरू झाले आहेत. मागणी वाढते आहे. औद्योगिक उत्पादनातही वाढ झालेली आहे. माणसे घराबाहेर पडत आहेत. अर्थकारणही नवी दिशा घेत आहे. अशावेळी वीज, विजेची अखंडित व पुरेसा पुरवठा महत्त्वाचा आहे. दसरा,दिवाळीत तर विजेची मागणी वाढते. अशावेळी कोळसा, कोळशाचे दर आणि टंचाईमुळे वीज संकट येणार असेल तर ते धोकादायक आहे. देशात काही राज्यात अघोषित भारनियमन सुरू झाले आहे. उत्तर प्रदेश, पंजाबमध्ये चार-पाच तास भारनियमन सुरू आहे. हे फारसे हितकारक नाही. विजेची मागणी वाढत असताना आणि औद्योगिक उत्पादनाला मागणी वाढत असताना प्रगतीसाठी निर्धाराने पावले टाकली पाहिजेत. पुरेसे भांडवल, कच्चा माल, वीज, पाणी आणि कुशल रोजगार उपलब्ध असला पाहिजे. विकासाची जी चाके आहेत त्यामध्ये वीज उत्पादनाला महत्त्व आहे. भारतात ग्रीन एनर्जी भरपूर तयार होऊ शकते त्या दिशेने गतीने व निर्धाराने पावले टाकली पाहिजेत. सौर ऊर्जेचा वापर करण्यासाठी जनतेला योजना दिल्या पाहिजेत. गृह बांधणी, शेती सुधारणा यामुळे सौरऊर्जेचा वापर होईल असे सोप, सोईस्कर तंत्रज्ञान विकसित केले पाहिजे. महाराष्ट्राचा विचार केला तर आपल्याकडे गॅस आणि कोळसा वापरून वीजनिर्मिती फारशी नाही. गॅसवर तर नाहीच त्यामुळे या दरवाढीचा महाराष्ट्राच्या विद्युत निर्मितीवर अनिष्ट परिणाम होणार नाही. आपला जलविद्युत निर्मितीवर भर आहे आणि महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी म्हणून ज्या कोयना प्रकल्पाकडे पाहिले जाते ते तुडुंब भरले आहे. रोज 1200 मेगॉवॅट विद्युत निर्मिती तेथे होते. ती महाराष्ट्रासह अन्य काही ठिकाणी दिली जाते. ओघानेच वीजटंचाईचे संकट घोंगावत असताना महाराष्ट्राला तशी भीती नाही. पण, शेजारी सणासुदीला अंधार, चीन, अमेरिका, वगैरे देशात अभूतपूर्व इंधन वीज टंचाई हे वीज महागणार यांचे निर्देश आहेत. आपणही या सावध हाका ऐकल्या पाहिजेत. प्रकाशपर्व येत आहे अशावेळी सर्व संकटावर मात करून पुढे गेले पाहिजे.
Previous Articleबनावट दागिने गहाण ठेवून सराफाची फसवणूक
Next Article नेहा शर्माचा चित्रपट 29 रोजी झळकणार
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.