केंद्र सरकारकडून स्थिती स्पष्ट, कोळसा पुरविण्याचा हालचाली गतिमान
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
दगडी कोळशाच्या आयातीत अडथळे निर्माण झाल्याने देशाला येत्या काही दिवसांमध्ये अभूतपूर्व वीज टंचाईला तोंड द्यावे लागणार आहे, या वृत्ताने गेले चार दिवस खळबळ उडविली आहे. केंद्रीय कोळसा मंत्री प्रल्हाद जोशी यांनी हे वृत्त निराधार असल्याचे स्पष्ट केले असले तरी अजून चिंता दूर झालेली नाही. या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सोमवारी केंद्रीय ऊर्जा मंत्री आर. के. सिंग आणि कोळसा मंत्री प्रल्हाद जोशी यांची भेट घेऊन चर्चा केली.
सध्याची वाढलेली वीजेची मागणी, कोळशाची उपलब्धता आणि वीजनिर्मिती क्षमता या मुद्दय़ांवर या तीन मंत्र्यांमध्ये साधारणतः 1 तास चर्चा झाली. या चर्चेत ऊर्जा आणि कोळसा विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱयांचाही समावेश होता.
अचानक वीजमागणीत वाढ
8 ऑक्टोबरला देशात 3,900 दशलक्ष युनिट्स वीजेची मागणी निर्माण झाली. ही ऑक्टोबर महिन्यातील एका दिवसातील सर्वात जास्त मागणी होती. त्यामुळे चिंतेचे वातावरण निर्माण झाले. शनिवारी टाटा पॉवर आणि डीडीएल यांनी आपल्या ग्राहकांना वीजेचे उत्पादन मर्यादित असल्याचे संदेश पाठविले. दुपारी 2 ने 6 या वेळेत वीजकपात होण्याचे संकेतही या कंपन्यांनी दिले.
याच कालावधीत आयात कोळशाचे दर वाढले. त्यामुळे कोळशाची आयात कमी करावी लागली. यंदाच्या वर्षात भारतात कोळशाचे विक्रमी उत्पादन झाले. मात्र पावसामुळे काही राज्यांमध्ये खाणीतून कोळशाच्या उपशावर परिणाम झाला. काही राज्यांमध्ये कोळशाचे खनन काहीकाळ थांबवावे लागले. परिणामी देशांतर्गत कोळशाचे उत्पादन घटले, असे स्पष्टीकरण देण्यात आले.
चिंतेचे कारण नाही
मात्र, विशेष चिंतेचे कारण नाही असे केंद्र सरकारकडून सोमवारीही प्रतिपादन करण्यात आले. वीज केंद्रांमध्ये पुरेसा कोळसा आहे. भारतीय रेल्वेने प्रतिदिन 16 लाख टन कोळसा देशभरात पुरविण्याची व्यवस्था केलेली आहे. ती 17 लाख टनांवर नेण्याचा जोरदार प्रयत्न चालू असून शक्य तितक्या प्रमाणात कोळसा पुरविण्यात येईल. यामुळे टप्प्याटप्प्याने कोळशासा साठा वीजनिर्मिती केंद्रांमध्ये होत राहील, असे कोळसा विभागाच्या अधिकाऱयांनी स्पष्ट केले आहे.
कोळशाचा तुटवडा आहेच
भारताच्या अनेक वीजनिर्मिती केंद्रांमध्ये कोळशाचा तुटवडा सध्या जाणवत आहे. केंद्र सरकारच्या वीज विभागाने पुढील कोष्टक प्रसिद्ध केले आहे. कोल इंडियाकडे 4 कोटी टन कोळसा आहे. तो या केंद्रांना पुरविण्याचा जोरदार प्रयत्न केला जात आहे, असेही सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
केंद्रांची संख्या, क्षमता साठा किती दिवस पुरेल
10 (11,540 मेवॅ) सहा दिवस
6 (6,730 मेवॅ) पाच दिवस
9 (7,864 मेवॅ) चार दिवस
19 (29,160 मेवॅ) तीन दिवस
18 (23,450 मेवॅ) दोन दिवस
30 (37,345 मेवॅ) एक दिवस
16 (16,880 मेवॅ) शून्य दिवस
तथापि, अनेक केंद्रांना आता कोळसा प्राथमिकता तत्वावर कोळसा पुरविला जाऊ लागला आहे. कमी दिवसांचा साठा असणाऱया केंद्रांना आधी कोळसा पुरविण्याची व्यवस्था करण्यात आली आहे, असे स्पष्ट करण्यात आले आहे.