प्रतिनिधी / पणजी :
आगामी मंत्रिमंडळ बैठकीत वीजबिले माफ करणारी आणि वीजग्राहकांना दिलासा देणारी योजना जाहीर न केल्यास पुन्हा एकदा वाढील बिलाविरुद्ध आंदोलन करण्याचा इशारा काँग्रेस पक्षाने दिला आहे. वीजमंत्री नीलेश काब्राल यांनी तसे आश्वासन दिले असल्याने काँग्रेसने हे आंदोलन तात्पुरते स्थगित केले आहे. तथापि वीजमंत्र्यांनी शब्द न पाळल्यास काँग्रेस पक्ष गप्प बसणार नाही तर पुन्हा रस्त्यावर उतरणार असल्याचे पक्षाने बजावले आहे.
पणजीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत काँग्रेसचे प्रवक्ते व पदाधिकारी संकल्प आमोणकर आणि अमरनाथ पणजीकर यांनी सांगितले की, गेल्या दोन महिन्यात राज्यातील जनतेच्या वाढीव वीजबिलांचा प्रश्न घेऊन काँग्रेस पक्ष तालुकावार आंदोलन करीत असून सरकार व पर्यायाने वीज खाते त्यावर मुग गिळून गप्प आहे. काँग्रेस पक्षाने वीजबिले माफ करण्यासाठी 15 दिवसांची मुदत दिली होती ती संपता संपता 14 व्या दिवशी सरकारने वीजबिलांच्या फिक्स शुल्कावर 50 टक्के माफ करणारी योजना जाहीर करून जनतेची थट्टा केली आणि फसवले. रु. 12, रु. 20 च्या आसपास किरकोळ रक्कम वजा करून जनतेच्या तोंडाला पाने पुसली आणि जखमेवर मीठ चोळले. काँग्रेसने हा प्रकार जनतेच्या निदर्शनास आणून आंदोलन चालूच ठेवले. वीज खाते मुख्य अभियंत्यांना निवेदने दिली. परंतु मागणी प्रमाणे मार्च, एप्रिल या लॉकडाऊन काळातील वीजबिले माफ झालेली नसल्याचे त्यांनी निदर्शनास आणले.
काँग्रेस पक्षातर्फे कुडचडे येथे आंदोलन करण्याची तयारी चालू असताना पोलिसांनी दादागिरी करून आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केला. तेथे वीजमंत्री काँग्रेस आंदोलकांना सामोरे गेले. त्यांची प्रतिमा, काँग्रेसची उपरणे वाहनातून काढून नेण्यात आली. तेव्हा पोलिसांसह मंत्र्यांकडे वाद झाला. त्यांना मोठय़ा रक्कमांची बिले दाखवण्यात आली. ती पाहून आगामी मंत्रिमंडळ बैठकीत त्याबाबत योजना जाहीर करण्याचे आश्वासन वीजमंत्र्यांनी दिल्याने त्याची प्रतीक्षा करण्यात येत नसल्याचे सांगण्यात आले.