आप नेते अमित पालेकर यांनी केली पोलखोल : मोफत वीज देण्यास विरोध केल्याचा काढला वचपा
प्रतिनिधी /पणजी
गोमंतकीय जनतेस मोफत वीज देणे सरकारला परवडणारे नाही असा दावा करून आम आदमी पक्षाच्या योजनेस जोरदार विरोध दर्शविणारे वीजमंत्री नीलेश काब्राल यांनी स्वतःच्या संपत्तीत मात्र केवळ पाचच वर्षात तब्बल 33.50 पटीनी वाढ केली आहे. यावरून गोमंतकीयांना वीज मोफत का मिळत नाही, हे स्पष्ट होते, असा टोमणा आम आदमी पक्षाचे नेते अमित पालेकर यांनी मारला आहे.
रविवारी पणजीत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पाच वर्षांत स्वतःच्या संपत्तीत 33.50 पट वाढ करणाऱया काब्राल यांच्यावर पालेकर यांनी जोरदार टीका केली.
वर्ष 2015-2016 मध्ये काब्राल यांची संपत्ती एकूण रु. 9,50,474 एवढी होती. त्यानंतर केवळ पाचच वर्षात म्हणजे वर्ष 2019-2020 मध्ये ती संपत्ती चक्क रु. 3,19,72,632 एवढी वाढली आहे. ही वाढ सुमारे 3000 टक्के एवढी आहे, असे पालेकर म्हणाले.
भाजपचे मंत्री भ्रष्टाचारी
यापूर्वी काब्राल यांनी आपचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांच्या मोफत वीज आश्वासनावर टीका केली होती. भ्रष्टाचार संपवला तर गोव्याला मोफत वीज देणे शक्मय आहे, असे ’आप’कडून वारंवार सांगण्यात आले आहे. परंतु राजकर्त्यांना भ्रष्टाचारातून कमावलेला पैसा हवा आहे. त्यामुळे ते मोफत योजनांस विरोध दर्शवत आहेत. म्हणुनच पाच वर्षांत काब्रालचे उत्पन्न भरमसाठ वाढले. यावरून भाजपचे मंत्री भ्रष्टाचारात किती गुंतले आहेत हे दिसून येते, असे पालेकर म्हणाले.
अर्थसंकल्पाचा पैसा कुठे जातो?
गोव्याचा अर्थसंकल्प 21,056.35 कोटी रुपयांचा आहे. प्रत्येक गोमंतकीयांवर 1.40 लाख रुपये खर्च करण्यात येते. काब्रालच्या संपत्तीत झालेली वाढ पाहिल्यास तो पैसा कुठे गेला हे लक्षात येईल. लोकांचा पैसा लुटणाऱया अशा गब्बरांना राजकारणामधून बाहेर फेकण्याची गरज आहे. कुडचडेच्या लोकांनी याचा गांभीर्याने विचार करावा व मतदारसंघाच्या भल्यासाठी ’आप’ला मत द्यावे, असे आवाहन पालेकर यांनी केले.
मायनिंग कॉरिडॉरचे आश्वासन कुठे गेले?
आपचे कुडचडेचे उमेदवार गाब्रियाल फर्नांडीस यांनी बोलताना, काब्राल यांनी 2012 मध्ये मायनिंग कॉरिडॉरचे आश्वासन दिले होते. परंतु अद्याप ते पूर्ण केलेले नाही. या प्रकल्पासाठी ज्यांच्या जमिनी गेल्या त्यांच्या हाती केवळ 10 ते 15 हजार रुपये टेकवून बोळवण करण्यात आली, त्यामुळे लोक संताप व्यक्त करत आहेत, असे सांगितले.
गेल्या 10 वर्षांपासून आमदार आणि मंत्री असूनही काब्राल यांना बसस्थानक प्रकल्प, क्रीडा संकुल, रवींद्र भवन, आदी एकही प्रकल्प अद्याप पूर्ण केलेला नाही. ते पूर्णतः अपयशी ठरले आहेत. आश्चर्यकारक प्रकार म्हणजे सध्या राज्यात आचारसंहिता लागू असतानाही भरारी पथकांच्या नाकावर टिच्चून कुडचडेत बिनदिक्कतपणे रस्त्यांचे हॉटमिक्स डांबरीकरण चालू आहे, असा दावा फर्नांडीस यांनी केला.