पंतप्रधान मोदींशी चर्चा केल्यानंतर ऊर्जामंत्र्यांचे स्पष्टीकरण
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
वीजनिर्मिती केंद्रांमध्ये कोळशाचा तुटवडा असल्याच्या वृत्ताच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी केंद्रीय ऊर्जामंत्री आर. के. सिंग आणि कोळसा मंत्री प्रल्हाद जोशी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा केली आहे. या मंत्र्यांनी पंतप्रधान मोदींना कोळशाच्या पुरवठय़ाच्या स्थितीची कल्पना दिल्याचे स्पष्ट करण्यात आले.
वीज पुरवठा सुरळीत असून विनाकारण घबराटीचे कारण नाही. ज्या केंद्रांमध्ये कोळसा कमी आहे, तेथे तो पाठविण्याची व्यवस्था करण्यात येत आहे. कोल इंडिया कंपनीजवळ पुरेसा कोळशाचा साठा असून सणासुदीच्या काळात वीजकपातीचे गंभीर संकट उद्भवणार नाही, याची दक्षता घेण्यात येत आहे, असे ऊर्जामंत्री सिंग यांनी स्पष्ट केले. जी समस्या आहे ती नियंत्रणात असून कोळशाची वाहतून सुरळीत सुरु आहे. त्यामुळे समस्या हाताबाहेर जाणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. कोळसा मंत्र्यांनीही कोळशाचा उपसा वाढविला जात असल्याची माहिती दिली.
तुटवडा होता पण…
देशाच्या काही वीजनिर्मिती केंद्रांमध्ये कोळशाचा तुटवडा मागच्या आठवडय़ात जाणवला होता. आंतरराष्ट्रीय बाजारात कोळशाच्या किमती अचानक वाढल्याने आयातीवर परिणाम झाला होता. तसेच सप्टेंबरातील जोरदार पावसामुळे खाणींमधील कामांवर परिणाम झाला होता. मात्र आता परिस्थिती झपाटय़ाने सुधारत असून कमी कोळसा असणाऱया वीजनिर्मिती केंद्रांवर कोळशाचा साठा करण्यात येत आहे, अशी माहिती प्रल्हाद जोशी यांनी पत्रकारांना दिली आहे.
राज्यांची चालढकल
जूनमध्ये कोळशाचे उत्पादन मोठय़ा प्रमाणात करण्यात आले होते. त्यावेळी राज्यांना अतिरिक्त कोळसा उचलण्यास आणि त्याचा त्यांच्या वीजनिर्मिती केंद्रांमध्ये साठा करण्यास सांगण्यात आले होते. तथापि, अनेक राज्यांनी केंद्राच्या या प्रस्तावाकडे दुर्लक्ष केले. त्याचवेळी कोळशाचा साठा केला असता तर ही परिस्थिती उद्भवली नसती, असेही केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे.