खानापूर तालुक्यातील पाच गावांतील प्रकार
प्रतिनिधी /बेळगाव
वीजपुरवठा नसल्याचा दावा करीत हेस्कॉमने खानापूर तालुक्मयातील पाच गावात तब्बल 1 कोटी 23 लाख 90 हजार रुपये खर्चून सोलार लाईट जोडणी केली आहे. प्रत्यक्षात मात्र यातील काही गावात वीजपुरवठा सुरळीत असून याबाबत चक्क खोटी माहिती त्रैमासिक विकास आढावा बैठकीत हेस्कॉमकडून देण्यात आली.
खानापूर तालुक्मयातील देगाव, मेंडील, केळील, तळेवाडी आणि होळदा येथे यापूर्वी वीजपुरवठा नव्हता. स्वातंत्र्योत्तर काळातही ही गावे अंधारात होती. मात्र, पाच-सहा वर्षांपूर्वी यातील देगाव, मेंडील, तळेवाडी या गावांना अवैधरीत्या वीजपुरवठा करण्यात आला आहे. वनखात्याने याबाबत न्यायालयात खटलादेखील दाखल केला आहे. कारण अभयारण्यात वीजखांब रोवण्यास वनखात्याचा आक्षेप होता.
सोमवारी येथील जिल्हा पंचायत सभागृहात झालेल्या जिल्हा विकास समन्वय आणि व्यवहार समिती (दिशा) सभेत वीजविरहित गावांची माहिती सभेचे अध्यक्ष खासदार अण्णासाहेब जोल्ले यांनी मागितली. यावेळी हेस्कॉमचे कार्यकारी अभियंते गिरीधर कुलकर्णी यांनी सदर पाच गावात अद्याप वीज पोहोचली नसल्याची चुकीची माहिती दिली. इतकेच नव्हे तर वीज नसल्याने या पाच गावांमध्ये सोलार दिवे लावण्यात आल्याचे त्यांनी सभागृहाला सांगितले. सोलार दिव्यांसाठी 1 कोटी 23 लाख 90 हजार रुपये खर्च केल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.
बेचिराख गावातही सौरदिवे?
खानापूर तालुक्मयातील केळील हे गाव कित्येक वर्षांपूर्वी बेचिराख झाले आहे. त्याठिकाणी सध्या लोकवस्तीच नाही. तेथील लोकांनी कधीच कृष्णापूर या ठिकाणी स्थलांतर केले होते. तरीही हेस्कॉमने केळील येथे सौरदिवे बसविल्याचा दावा करीत जणू ‘उजेड’च पाडला आहे.