प्रतिनिधी / लांजा
महावितरणने काढलेल्या भरमसाट वीज बिलांमध्ये ग्राहकांना सवलत देण्यात यावी आणि कोणाचेही वीज कनेक्शन कापू नये, अशी मागणी लांजा तालुका भाजपाच्या वतीने करण्यात आली असून याबाबतचे निवेदन आज भाजपाच्या वतीने महावितरणच्या अधिकायांना सादर करण्यात आले.
या निवेदनात म्हटले आहे की लॉकडाउनच्या काळात अनेक ग्राहकांची बिले ही
भरसमाट आली आहेत. महाराष्ट्र राज्य वीज वितरण मंडळाच्या कामगारांनी कोणत्या प्रकारची रीडिंग न घेता ही अंदाजे बीले केली असल्याने त्याचा मोठय़ा प्रमाणात फटका सर्वसामान्य ग्राहकांना बसला आहे. महाविकास आघाडी सरकारने वीज ग्राहकांना सवलत देऊ असे जाहीर केले होते. मात्र कोणतेही आश्वासन किंवा लेखी स्वरुपात निर्देश आलेले नाहीत. त्यामुळे त्याचा फटका वीज ग्राहकांना बसला आहे. आणि दुसरीकडे महावितरण कंपनीने वीज बिले वसूल करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारचा आपण लांजा तालुका भाजपाच्या वतीने निषेध करत असून महावितरणने वीज ग्राहकांना सवलत द्यावी, कोणाचेही वीज कनेक्शन कापू नये अशी मागणी या निवेदनाद्वारे भाजपाच्या वतीने करण्यात आले आहे .
भाजपाच्या वतीने निवेदन सादर करताना तालुकाध्यक्ष महेश उर्फ मुन्ना खामकर, पदाधिकारी हेमंत शेटय़े, ओबीसी सेलचे तालुकाध्यक्ष दादा भिडे, ओबीसी सेलचे शहरअध्यक्ष अशोक गुरव, नगरसेवक संजय यादव, मंगेश लांजेकर शीतल सावंत, जिल्हा चिटणीस यशवंत वाकडे, तालुका प्रभारी वसंत घडशी, तसेच शहराध्यक्ष प्रमोद करूप, चंद्रकांत मांडवकर, संजय गुरव, रमाकांत सावंत, बन्सी गांधी, प्रवीण सुर्वे, आत्माराम धुमक, समीर कोत्रे, इक्बाल गिरकर, नाना शेटे आदी पदाधिकारी उपस्थित होते.