प्रतिनिधी/ सातारा
साताऱयातील करंजे पेठेत वीज कनेक्शन तोडल्याच्या कारणातून महावितरणच्या दोन कर्मचाऱयांना बेदम मारहाण झाल्याची घटना घडली. दरम्यान, तक्रार दाखल करण्यासाठी महावितरणच्या कर्मचाऱयांनी कामबंद आंदोलन केले. त्यानंतर वायरमन विजय संपत फडतरे यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर मारहाण प्रकरणी सुलेमान अप्पा तहसीलदार आणि सादिक रहिमबक्ष पैलवान यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, मंगळवारी सकाळी करंजेपेठेतील बाबर कॉलनी येथे शंकर बाबूराव किर्दत (रा. एकता कॉलनी, रघुनाथपुरा पेठ, करंजेपेठ, सातारा) Rयांचे वीजबिल थकीत होते. कनेक्शन तोडण्याच्या यादीत त्यांचे नाव असल्याने या मोहिमेवर असलेले वायरमन विजय संपत फडतरे व साईराज गोरख पोळ वीजेचे कनेक्शन तोडण्यासाठी गेले होते.
मात्र, त्या घरात भाडय़ाने रहात असलेल्या नसीम आप्पा तहसीलदार यांना तशी कल्पना देवून फडतरे व पोळ यांनी वीज कनेक्शन खंडीत केले. त्यावेळी सुलेमान आप्पा तहसीलदार याने दोघांना शिवीगाळ सुरु केली. कनेक्शन जोडून दे नाहीतर तुम्हाला बघून घेईन अशी धमकी दिली. त्यानंतर पोळ व फडतरे तेथून पुढे एकता कॉलनीत असताना दुचाकीवरुन त्यांच्या पाठीमागे आलेल्या सुलेमान तहसीलदार आणि सादिक रहिमबक्ष पैलवान (वय 42, गुरुवार परज, सातारा) यांनी कनेक्शन जोडून दे म्हणत मारहाण करत दमबाजी केली.
या प्रकारामुळे महावितरणच्या कर्मचाऱयांनी कामबंद आंदोलन करत या घटनेचा निषेध व्यक्त केला. त्यानंतर वायरमन विजय फडतरे यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर सुलेमान तहसीलदार व सादीक पैलवान यांच्यावर शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आली नव्हती.
लोकभावनाही लक्षात घेण्याची गरज
लॉकडाऊन नंतर राज्यभर महावितरण कंपनीने नागरिकांना वीजबिले निर्धारित वेळेत भरण्याचे आवाहन केले होते. मात्र, लॉकडाऊनमधून पुरते न सावरलेल्या नागरिकांनी टप्प्या-टप्प्याने वीजबिल भरण्याची मुभा द्यावी, अशी मागणी केली होती. तरीही थेट वीज कनेक्शन तोडण्याची मोहीम हाती घेतली. आठच दिवसांपूर्वी सातारा येथील व्यापाऱयांनी शटर डाऊन आंदोलन करुन महावितरणच्या सक्तीच्या वीजबिल वसुलीविरोधात आंदोलन केले होते. त्यामुळे कारवाई करताना लोकभावनाही विचारात घेण्याची गरज व्यक्त होत आहे.