शिवसेना आमदारांची मुख्य अभियंत्यांकडे तक्रार
वार्ताहर / आळसंद
थकबाकी वसुली मोहिमेच्या नावाखाली वीज कर्मचारी नोटीस न देता कनेक्शन तोडत आहेत आणि शेतकऱ्यांना अर्वाच्य बोलत असल्याने ही मोहीम थांबवण्याची तक्रार सत्ताधारी शिवसेनेचे आमदार अनिल बाबर यांनी कोल्हापूरच्या मुख्य अभियंत्यांकडे केली आहे.
बाबर हे सांगली जिल्ह्यातील खानापूर मतदार संघाचे आमदार आहेत. वीज कर्मचाऱ्यांनी सौजन्याने वागून वसुली करायचे ठरवले तर आम्ही त्यांना सहकार्य करू मात्र शेतकऱ्यांनी ग्राहकांना अर्वाच्य भाषा वापरून वीज कनेक्शन तोडले तर आम्हाला त्याला विरोध करावा लागेल असा इशारा खुद्द सत्ताधारी आमदारांनीच दिल्याने अधिकारी वर्गातही खळबळ माजली आहे.
याबाबत आमदार बाबर यांनी कोल्हापूरच्या वीज मंडळाच्या मुख्य अभियंत्यांकडे केलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, करोणा महामारीमुळे लॉकडाऊन ची स्थिती असताना वेळेत वीजबिले न पोहोचवता एकत्रित बिले आणून दिली जात आहेत. त्यामुळे लोकांना त्याचा भरणा करणे मुश्कील झाले आहे. कोणतीही नोटीस न देता कनेक्शन तोडणे, वसुलीला गेले असताना अर्वाच्य भाषेचा वापर करणे असे प्रकार कर्मचारी करत आहेत. त्यामुळे शेतकरी वर्गात संतापाची भावना निर्माण झाली आहे. आपल्या मतदारसंघात वीज तोडण्याची कारवाई थांबवावी, सौजन्याने वसुली केली तर त्यांना सहकार्य मिळेल, अन्यथा त्याला विरोध करावा लागेल असा इशाराही आमदार बाबर यांनी पत्रात दिला आहे.